गिरगाव येथील भवन्स महाविद्यालयाचा अजब प्रकार

महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यापीठाकडे नोंदणी न झालेल्या गिरगाव येथील भवन्स महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. याच महाविद्यालयात असा प्रकार अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाल्याचे समोर आले असून आता येथील विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रिया स्वत:च पार पाडण्यास सांगण्यात आले आहे. दुसरीकडे ही प्रक्रिया नेमकी कशी करायची याबाबत माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. माहिती भरण्यात चुका झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घेतलेल्या विषयांऐवजी भलत्याच विषयांच्या परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या या भोंगळ कारभाराबाबत विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली असून याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

अनेक महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया रखडते. गुणपत्रिका घेते वेळेस ही बाब लक्षात येत असे. यामुळे विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची केली. ही नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो त्या महाविद्यालयाने त्याच्या नोंदणीची पुढची प्रक्रिया करून ती विद्यापीठ स्तरावर निश्चित करावयाची असते. पण गिरगाव येथील भवन्स महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांची ही प्रकियाच पूर्ण केली नसल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. याचा फटका नुकताच तीन विद्यार्थ्यांना बसला होता. या तीन विद्यार्थ्यांनी पोलीस तक्रार केली म्हणून हा प्रकार समोर आला असला तरी गेल्या तीन वर्षांपासून या महाविद्यालयात असे प्रकार घडत असून अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे महाविद्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर यंदा महाविद्यालयाने बहुतांश विद्यार्थ्यांची नोंदणी निश्चित करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच सोपवल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. ही प्रक्रिया करण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिला जातो व त्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले जाते. पण ही प्रक्रिया नेमकी कशी करायची याबाबत विद्यार्थ्यांना पुरेसे ज्ञान नसल्यामुळे अनेकदा विषय निवड करताना विद्यार्थ्यांकडून चूक झाली याचा फटकाही आता या विद्यार्थ्यांना बसत आहे.

म्हणजे काही विद्यार्थ्यांनी नोंदणी निश्चित करताना निवड केलेला विषय हा त्यांना शिकवल्या जाणाऱ्या विषयापेक्षा वेगळा होता. पण ही बाब विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र समोर आल्यावर लक्षात आल्याने त्यांचा गोंधळ उडाला असून याबाबत महाविद्यालय विद्यार्थ्यांना कोणतेच मार्गदर्शन करत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

या संदर्भात ‘मुप्ता’ या शिक्षक संघटनेने कुलगुरूंना पत्र लिहिले असून महाविद्यालयात सुरू असलेल्या या गैरप्रकाराची सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे संघटनेचे सचिव व माजी अधिसभा सदस्य डॉ. विजय पवार यांनी सांगितले. तर महाविद्यालयाकडून असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे महाविद्यालयाचे संचालक सुधीर चितळे यांनी स्पष्ट केले.

अनेकदा विद्यार्थ्यांकडून वेळेवर कागदपत्रांची पूर्तता होत नाही आणि याचा फटका प्रक्रियेवर बसू शकतो. तसेच काही विद्यार्थ्यांच्या यासंदर्भात तक्रारी असतील त्या दूर केल्या जातील असेही ते म्हणाले. तसेच दैनंदिन कामकाज ही माझी जबाबदारी नसल्यामुळे प्राचार्य अधिक चांगली माहिती देऊ शकतील असेही ते म्हणाले. महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.