अवघ्या चार महिन्यांत विकास, खुली व्यायामशाळा आणि विविध सुविधा मुंबई : वरळीतील बीडीडी चाळींच्या परिसरातील प्रसिद्ध जांबोरी मैदानाचा पालिकेने कायापालट केला आहे. अवघ्या चार महिन्यांत पालिकेने या मैदानात तब्बल १५ हजार चौरस फुटांचे एक स्वतंत्र क्रीडांगण विकसित केले आहे. त्याचबरोबर कबड्डी, बॅडिमटनसह इतरही खेळांसाठीच्या खेळपट्टय़ा, धावपट्टय़ा, लहान मुलांसाठी स्वतंत्र स्केटिंग ट्रॅक, पदपथ, लाकडी उपकरणे असणारी खुली व्यायामशाळा अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वरळीतील ‘महात्मा गांधी मैदान’ म्हणजेच ‘जांबोरी मैदाना’चे पालिकेचा जी दक्षिण विभागाने विकास केला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील या मैदानाचा विकास जिल्हा नियोजन समितीच्या व पालिकेच्या निधीतून करण्यात आल्याची माहिती जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या या मैदानात दीड कोटी रुपयांच्या संयुक्त निधीमधून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. या मैदानात लवकरच खुले वाचनालय व त्यावर प्रेक्षक गॅलरी, योग केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा, लहान मुलांसाठी खेळणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उघडे यांनी सांगितले. मैदानातील सुविधा ’ तब्बल १ लाख ४५ हजार चौरस फुटांच्या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी १४ ठिकाणी पाण्याचे फवारे बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे निर्धारित वेळी मैदानात पाणी फवारण्यात येत असून यामुळे मैदानात ओलावा राहतो. ’ लाकडी उपकरणे असलेली खुली व्यायामशाळा असून डंबेल्स, वेटलिफ्टिंग, पूल-अप्स आदी उपकरणांचा त्यात समावेश आहे. ’ मैदानालगत खुले योग केंद्र उभारण्यात येत असून याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या योग केंद्रात एका वेळी सुमारे ३० व्यक्ती योगाभ्यास करू शकतील. ’ मल्लखांब या भारतीय खेळाचा सराव करण्यासाठी आवश्यक ते साहित्य लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार ’ मैदानात ५,१०० चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराचे मल्टी-स्पोर्टस् रबरमॅट कोर्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे. ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी मैदानात समतोलीकरणाचे काम सुरू असताना एका कोपऱ्यात जमिनीखाली एक ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी आढळली आहे. या टाकीची नोंद सरकारी किंवा पालिकेच्या कागदपत्रांमध्ये आढळली नाही. सुमारे सव्वा लिटर पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या टाकीचा उपयोग आता वर्षां जल संचयनांतर्गत पावसाचे पाणी साठविण्यासाठी केला जाणार आहे.