दिवाळीच्या काळात राज्यात फटाक्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावाबद्दल बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार काही दिवसांपूर्वीच दिल्लीत फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात होती. त्यापाठोपाठ राज्य सरकारच्या प्रदुषणमुक्त दिवाळी अभियानाच्या अनुषंगाने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही महाराष्ट्रात फटाक्यावर बंदी घालण्याचे संकेत दिले होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर मुंबई हायकोर्टानेही निवासी भागात फटाके विक्रीचे परवाने रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे राज्यात फटाक्यांविना दिवाळी साजरी होणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी आहेत. ते देखील काढा हवं तर. अशीही आपल्याकडच्या सणांची रया गेली आहेच. शांततेचा अतिरेक झाला तर एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल, अशा शब्दांत उद्धव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. फटाकेबंदीच्या निर्णयानंतर अनेक स्तरातून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध केला असल्यानं आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, काल फटाकेबंदीविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे म्हणणाऱ्या रामदास कदम यांच्या भूमिकेतही बदल झालेला पाहायला मिळाला. संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी चिंता करु नये, हिंदूंच्या सणाची काळजी या रामदास कदमला आहे, बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, कृपया आपण लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये, महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.