मुंबई : इंडिया आघाडीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शिवसेनेने त्यांच्या कोटय़ातून जागा सोडावी. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा सोडली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी चर्चा झाली. राज्यातील जागावाटपाच्या सूत्रावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. याशिवाय काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधण्यात आला. राज्यातील ४८ जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रत्येकी १६ जागा वाटून घ्याव्यात, असा प्रस्ताव चर्चेला आला. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेना १८, राष्ट्रवादी चार तर काँग्रेसचा एक खासदार निवडून आला होता. बदलत्या राजकीय परिस्थितीत तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा परस्परांमध्ये वाटून घ्याव्यात, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हेही वाचा >>> Maratha reservation: जरांगेंचे उपोषण सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची प्रतीक्षा काँग्रेसची १६ जागा स्वीकारण्यास तयारी नसल्याचे समजते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडानंतर शिवसेना व राष्ट्रवादी कमकुवत झाली आहे. यामुळे या दोन्ही पक्षांना एवढय़ा जागा सोडण्यास काँग्रेसची तयारी नसल्याचे नेत्यांकडून सांगण्यात आले. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्यासाठी इंडिया आघाडी जागा सोडणार नाही. शिवसेना आणि वंचितची युती असल्याने शिवसेनेने त्यांच्या कोटय़ातून प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी जागा सोडावी, असे स्पष्ट करण्यात आले.