‘गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स’ची पाहणी बहुतांश मतदारांना सुशिक्षित उमेदवार हवा असून मतदानाबाबत उदासीनता वाटण्याचे कारण हे उमेदवाराचा यथातथा दर्जाच कारणीभूत असल्याचे आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स’ने राज्य निवडणूक आयोगाच्या मदतीने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. या पाहणीत उमेदवारांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात ८४ टक्के मतदारांना त्यांचा उमेदवार ४० वर्षांपेक्षा कमी वयाचा व सुशिक्षित असावा, असे वाटते आहे. गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्सने ही पाहणी राज्यातील १६ महानगरपालिका, नगरपंचायतींमध्ये केली. गेल्या दीड वर्षांत राज्य निवडणूक आयोगाबरोबर संस्था निवडणुकांविषयी अभ्यास करत आहे. या निवडणूक अभ्यासात समोर आलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेतर्फे नुकतीच पत्रकार परिषद घेतली. नगरपालिकांमधील मतदाराला उमेदवाराबद्दल काय वाटते आणि दुसरे म्हणजे महानगरपालिकांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी का असते, या दोन प्रमुख मुद्दय़ांवर मतदारांची पाहणी केली. नगरपालिका पाहणीत अनेक उमेदवार अशिक्षित असल्याबद्दल मतदारांनी निराशा व्यक्त केली. तसेच, उमेदवार कोणत्याही कामासाठी उपलब्ध नसतात, अशी खंत मतदारांनी व्यक्त केली. त्यामुळे उमेदवार हा पदवीधारक व प्रभागनिहाय कामासाठी उपलब्ध असावा, प्रभागस्तरीय काम प्रामुख्याने करणारा असावा अशी मते मतदारांनी व्यक्त केली. मतदार यादीत नाव नसल्याने पालिका निवडणुकीत कमी मतदान होते. तसेच, चांगले उमेदवार नसणे, पालिकेकडून हव्या त्या सुविधा न मिळणे अशा विविध कारणांमुळे मतदान होत नाही. मतदान करणारे बहुतेक वेळा उमेदवार खूपच चांगला आहे म्हणून मतदान करतात. तो निवडून यावा, अशी त्यांची इच्छा असते. उमेदवाराच्या गुणवत्तेवर निवडणुकीची गणिते ठरत असतात. त्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या वेळी तिकीट देताना उत्तम दर्जाचा उमेदवार दिल्यास मतदानाची टक्केवारी वाढू शकते. -मानसी फडके, सदस्य, संस्था