‘‘आपसात वाद घातल्याने दोघांचेही नुकसान होते, तरीही कुणी वाद सोडत नाही. स्वार्थ भावनेमुळे नुकसान होते, हेही सर्वाना माहिती आहे. मात्र कुणीही स्वार्थ सोडायला तयार नाही.  हे तत्त्व देश आणि व्यक्ती, सगळ्यांनाच लागू होते,’’ असे राज्यातील सत्तापेचाबाबत सूचक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी केले. नागपुरात मुख्याध्यापक परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्दय़ांवरून एकमत न झाल्याने महायुतीला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादानंतर माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी संघाचे मुख्यालय गाठत सरसंघचालकांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतरही सत्तेचा तिढा सुटलेला नाही. या पाश्र्वभूमीवर डॉ. भागवत यांनी स्वार्थवृत्तीवरून केलेल्या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

‘‘स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट आहे, हे सर्वाना माहीत आहे. मात्र खूप कमी जण आपला स्वार्थ सोडतात. देशांचे उदाहरण घ्या किंवा व्यक्तींचे. निसर्ग नष्ट केल्याने आपलाही विनाश होणार आहे, हे माणसाला माहीत आहे. मात्र निसर्ग नष्ट करण्याचा प्रकार थांबलेला नाही. आपसात भांडण केल्याने दोघांचेही नुकसान होते, परंतु आपसातील भांडणे अद्यापही बंद झालेली नाहीत,’’ असे सरसंघचालक म्हणाले.