राजेश्वर ठाकरे

निधी आणि मनुष्यबळाची वानवा

संत्री आणि इतर लिंबुवर्गीय फळांवर संशोधन होऊन शेतकऱ्यांना दर्जेदार फळाचे उत्पादन घेता यावे आणि त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या हेतूने नागपुरात उभारण्यात आलेल्या केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेला मनुष्यबळाची आणि निधीची भीषण चंटाई जाणवत असून या संस्थेने तीन वर्षांपूर्वी विकसित केलेली बीजरहित नागपूर संत्र्याची रोपटी शेतकऱ्यांना मिळणेही कठीण झाले आहे.

संत्र्यांचा रस जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळे अनेक देशांनी बीजरहित संत्र्यांचे उत्पादन घेण्यास प्रारंभ केला. भारतात २०१५ मध्ये बीजरहित संत्री विकसित झाले. त्याला ‘एनआरसीसी बीजरहित नागपूर संत्री-४’ असे नाव देण्यात आले. त्याचे रोपटे २०१५ पासून वितरित करण्यात येऊ लागले आहेत. बीज असलेल्या संत्र्याचा रस केल्यास कडवटपणा जाणवतो आणि त्यामुळे त्याला पसंती कमी असते. काही खासगी कंपन्या रसायनांचा वापर करून त्यातील कडवटपणा घालवतात, परंतु त्याची किंमत वाढते आणि रसायन देखील मानवी शरीरात जाते. त्यावर बीजरहित संत्री हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे अशाप्रकारचे संत्री उत्पादित करण्यास बागायतदारांनी प्राधान्य दिले. मात्र, त्याची रोपटी रोगरहित या संस्थेकडे किंवा शासकीय रोपवाटिकेत उपलब्ध नाही. संस्था वर्षभरात सुमारे दोन हजार रोपटे तयार करीत असते आणि देशाची मागणी सुमारे पावणेदोन कोटी आहे. त्यामुळे बहुतांश भागात अजूनही बीज असलेले रोपटे लावण्यात येत आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एनआरसीसीने तीन वर्षांपूर्वी बीजरहित नागपूर संत्री विकसित केली. त्याचे रोपटे शेतकरी, शासकीय, खासगी रोपवाटिकांना उपलब्ध केले आहे. त्याची संख्या दरवर्षी वाढवली जात आहे. यावर्षी अडीच-तीन हजार रोपटे वितरित करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या रोपटय़ांना पुढील वर्षी फळे येतील आणि बीजरहित नागपूर संत्री बाजारात येईल, असे सीसीआरआयचे संचालक डॉ. एम. एस. लदानिया म्हणाले.

नागपुरी संत्री

बीजरहित-४ या वाणाचे उत्पादन प्रतिहेक्टर २७.१५ टन घेतले जाऊ शकते. या झाडाला सुमारे ९८ किलो फळ धरू शकतात. हे या संस्थेच्या शेतातील प्रयोगशाळेतून दिसून आले. या झाडाचे वय १० ते १५ वर्षे आहे. साध्या संत्र्याच्या एका फळात साधारणत: १२ ते १३ बिया असतात. नवीन बीजरहित वाणात दोन ते तीन बिया असतात. नागपुरी संत्र्याच्या एका झाडाला प्रतिवर्ष ५२० फळे लागतात

‘‘एनआरसीसीकडून गेल्या तीन वर्षांत एकदाही बीजरहित रोपटे मिळालेले नाही. जेव्हा जेव्हा मागणी केली, तेव्हा रोपटे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. नेमके कोणाला रोपटे दिले जाते हेच कळत नाही.

– अमिताभ पावडे, शेतकरी, नरखेड

‘‘एनआरसीसी ही संशोधन संस्था आहे. देशभरातील संत्रा उत्पादकांना ही संस्था रोपटे उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यासाठी मोठय़ा संख्येने रोपवाटिका सुरू करणे आवश्यक आहे. या संस्थेत रोपटे तयार करायचे असतील तर वाढीव मनुष्यबळ आणि पुरेसा निधी देण्यात यावा. यासंदर्भात केंद्रीय कृषी खात्याचे मंत्री, सचिव, लोकप्रतिनिधींना कळवण्यात आले आहे. अनेकदा पत्रव्यवहार देखील केला आहे. सध्या संस्थेकडे अत्यल्प मनुष्यबळ आहे. तसेच निधीचीही चणचण आहे.’’

– डॉ. एम.एस लदानिया, संचालक, सीसीआरआय