नागपूर : महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या ४८ तासांत पावसाची हजेरी दिसून येणार आहे.

महाराष्ट्रात गेले दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात काही जिल्ह्यांत गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांचे गारपीटीसह झालेल्या या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. आता नव्याने ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रीय झाला असून राज्यातच नाही तर संपूर्ण देशात हवामानात मोठे बदल घडून येत आहे. त्यामुळे २८ व २९ फेब्रुवारीला अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय पक्षीगणना ! वर्धा जिल्हा नोंदणीत अग्रेसर, आढळले ‘हे’ पक्षी

हेही वाचा – गडचिरोली : ‘एमआयडीसी’ भूसंपादनप्रकरणी शेतकरी आक्रमक; जमीन मोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठवले

विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा एकदा गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.