लोकसत्ता टीम

गोंदिया : राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांना विमान घोटाळा प्रकरणी सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना दिलासा मिळाला आहे. सीबीआयने दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात या याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल पटेल यांना टोला लावला असून ते वाशिंग मशीन मध्ये गेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे जे व्हायचं ते होणारच होतं असं म्हटलं आहे.

देशात गेल्या १० वर्षापासून ईडी आणि सीबीआय हे नरेंद्र मोदी यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जे तिकडे गेले त्यांना माफी मिळणारच आहे. असे नाना पटोले म्हणाले… तिरोडा येथील जुनी नगर परिषद ग्राउंड वर गुरूवारी प्रचार सभा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत ते बोलत होते. पटोले म्हणाले की पुढील काही दिवसात त्यांना इकबाल मिरची प्रकरणातून पण क्लिनचिट मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हे समजण्यास पण आता हरकत नाही.

आणखी वाचा-शिवजयंतीला गालबोट, मिरवणुकीवर दगडफेक; नांदुऱ्यात अटकसत्र सुरू

रामटेक मतदारसंघा बद्दल बोलताना पटोले म्हणाले तिथं दुसरा फार्म आम्ही भरला होता. त्यामुळे तिथं आमचा उमेदवार आणि पंजा दोन्ही राहणार आहे. हे सगळी राजकीय द्वेषपोटी भाजपनी केलेली खेळी आहे. पण ते इतक्या खालच्या पातळीपर्यंत प्रयत्न करणार ही अपेक्षा नव्हती. अमरावती नवनीत राणा भाजपची उमेदवार यावर बोलताना पटोले म्हणाले की भाजपची केंद्र सरकार घाबरल्यामुळे लहान सहान पक्षांनाही जवळ करत आहे. चारशे चे लक्ष ठेवता आणि तुम्हाला अश्या प्रकारे उमेदवार आयात करावे लागत आहे. एकंदरीत भाजपला समोर पराभव दिसू लागला आहे . त्यामुळे दुसऱ्यांचे नेते पळविणाऱ्या हा पक्ष आहे अशी टीका ही पटोले यांनी केली.

ज्याप्रमाणे दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सारख्या लोकांना ई डी मध्ये अडकविले जात आहे. शिवसेना उबाठा चे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ई डी ची नोटीस घाबरविण्याकरिता दिलेली आहे. खरं तर आता ई डी भाजप नेत्यांना लागायला पाहिजे. ७० हजार कोटीचा घोटाळा पंतप्रधान जाहीर करतात आणि दोन दिवसांनी त्यांच्याच मांडीला मांडी बसता,त्यांना मंत्रिमंडळात घेतले जाते. अश्या भ्रष्टाचारी लोकांवर ई डी लावायला पाहिजे.पण ते नाही करणार.. विरोधकांची अश्या प्रकारे मुस्कटदाबी आता सहन केली जाणार नाही,निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. जनता जनार्धन हे सर्व बघत आहे.

आणखी वाचा-ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…

लोकांमध्ये मोदी सरकार विरोधात प्रचंड राग आहे. शेतकरी, तरुण, छोटा व्यापारी ,सर्व सामान्य जण यांच्या मनात राग आहे.त्यामुळे पुढील निवडणुकीत हे १५० पार जाणार नाहीत. यांना सत्तेतून जनताच बाहेरचा मार्ग दाखविणारा अशी टीका काँग्रेस पक्षातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या प्रसंगी गोंदिया भंडारा लोकसभा काँग्रेस उमेदवार डा. प्रशांत पडोळे , नीलम हलमारे,अमर वराडे आदि उपस्थित होते.