नागपूर: आपण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांचाही काळ पाहिला आहे. मात्र, पहिल्यांदा देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा,परंपरांना लोक नावे ठेवायची. मात्र, आज मोदींमुळे देशाचा जगात गौरव वाढत आहे, अशा शब्दात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते  बोलत होते.

आत्मनिर्भर भारताची गोष्ट करणारे आमचे पंतप्रधान वीस तास काम करतात. काही सहकारी सांगतात की, रात्री बारा नंतर मोदी काही वेळच आराम करत असतील तेवढेच. नाहीतर आम्ही त्यांना सतत काम करताना पाहिले आहे. आमचे हे भाग्य आहे की, आज आम्हाला असे नेतृत्व मिळाले. त्यामुळे जग आमचा सन्मान करत आहे. विदेशात असणारे माझे सगळे परिचीत मोदींमुळे आज गर्वाने भारतीय आहोत हे सांगू शकतात,असे राज्यपाल म्हणाले.

देशाचा स्वाभीमान जागृत झाला आहे. नाहीतर याआधी भारतात काहीच करण्यासारखे नाही, यांच्या पद्धती खराब, हा गुलामांचा देश आहे, असाच समज होता. परंतु, आमचा इतिहास गौरवशाली आहे. अलेक्झांडर, मुघल आणि ब्रिटीशांनाही या देशाने धुळ चाखली आहे. आज माेदींमुळे देश जागृत होत आहे. देशाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपूर विद्यापीठाने सक्षम भारताच्या उभारणीसाठी सहयोग करावे असे आवाहनही कोश्यारी यांनी केले.