नागपूर : नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त न करताच विमानतळ प्राधिकरणाने या कामाच्या निमित्ताने विमानांचे वेळापत्रक बदलले. दुपारच्या सत्रातील विमाने सकाळी किंवा रात्रीच्या वेळी करण्यात आली. यामुळे मागील अडीच महिन्यापासून प्रवाशांची गैरसोय होत असून देखभाल दुरुस्तीची कामेही ठप्प आहेत.

जूनपासून मान्सूनचे आगमन होईल आणि पुढील तीन महिने पावसाळा राहण्याची शक्यता आहे. अशावेळी नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम होण्याची शक्यता धूसर आहे. मात्र, यासाठी तब्बल अडीच महिन्यांपासून दुपारच्या वेळातील उड्डाणे बंद करून प्रवाशांना वेठीस धरण्यात आले आहे. मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यासाठी सहा महिन्यापूर्वीच वेळापत्रकात बदल करण्याची सूचना दिली. त्यानुसार विमानाचे नियोजित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. नागपूर विमानतळावर सकाळी १० पूर्वी आणि सायंकाळी ६ नंतर विमान सेवा सुरू ठेवण्यात आली. नागपूर येथे दररोज ५० हून अधिक विमानाची वाहतूक होते. येथून दररोज सरासरी सहा ते सात हजार प्रवाशांची ये-जा असते.

हेही वाचा….आनंद वार्ता! सोन्याच्या दरात मोठी घसरण, ‘हे’ आहेत आजचे दर…

धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने केले जाते. पण ‘एएआय’ने निविदा प्रक्रिया आणि कंत्राटदार नियुक्त करण्यात विलंब केला. निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच विमानाच्या वेळापत्रकात बदल करण्याची सूचना ‘डीजीसीए’ने केली होती. हा घोळ झाल्याचे ‘एमआयएल’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, यासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या अधिकारी (स्थापत्य) फतीना यांनी बोलण्यास नकार दिला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ संचालक मो. आबीद रुही यांनी विमानतळाच्या वेळापत्रकात मार्चपासून बदल झालेला असून तो कायम आहे, असे सांगितले.

हेही वाचा….‘आरटीई’ घोटाळ्यात पालकही अडकले; दोघांना अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

समन्वयाचा अभाव

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन मिहान इंडिया लि. (एमआयएल) यांच्याकडे आहे. ‘एमआयएल’ ही भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांची संयुक्त कंपनी आहे. ‘एएआय’कडे निविदा काढून विमानतळाच्या धावपट्टीची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आहे. त्यानुसार ‘एएआय’ने कामाची निविदा काढली. अद्याप कंत्राटदार नियुक्त होऊ शकलेला नाही. पण, निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच विमानाच्या वेळापत्रकात बदल आले. त्यामुळे दुपारचे उड्डाण बंद केल्याने प्रवाशांना नाहक त्रास झाला आणि धावपट्टीचे कामही झाले नाही. अशाप्रकारे डीजीसीए आणि एएआय यांच्या समन्वयाचा अभाव याप्रकरणात दिसून आला आहे.