केंद्र व राज्य शासनाकडून रोकडरहितच्या व्यवहाराचे आवाहन केले जात आहे. मात्र यातून पेटीएमचा फायदा करून देण्याचा प्रयत्न आहे असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या कंपनीचा ४० टक्के भाग हा अलिबाबा या चिनी कंपनीचा, तर २० टक्के भाग हा सिंगापूरच्या एका कंपनीचा असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे देशी कंपनीऐवजी विदेशी कंपन्यांना लाभ पोहोचवण्याचा हा घाट केल्याचे दिसत आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. त्यांनी भाजपने लोकसभा व विविध राज्यांच्या निवडणुका क्रेडिट, डेबिट कार्डातून पैसे काढून लढवल्या काय, हा प्रश्नही विधान भवन परिसरात उपस्थित केला.

जुन्या नोटा चलनातून बाद केल्यावर रोकडरहित व्यवहाराकरिता भारतीय कंपनीला प्रोत्साहित करण्यासह निर्णयापूर्वीच स्वत: काही पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते, परंतु दोन्ही सरकार तसे न करता पेटीएमचा प्रचार करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. बहुतांश विकसित देशांत मोठय़ा प्रमाणावर रोखीने व्यवहार चालतो. भारतात पूर्ण व्यवहार कोणतेही नियोजन न करता सर्व व्यवहार रोकडरहित कसे करणार, या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही नाही.