यवतमाळ : ब्रिटीशकालीन शकुंतला रेल्वे हा यवतमाळचा ऐतिहासिक ठेवा आहे. जेव्हा दळणवळणाची कोणतीही साधने नव्हती तेव्हा ‘शकुंतला’च महत्वाचे साधन होती. ब्रिटीशकाळात यवतमाळातील कापूस थेट मँचेस्टरला नेणारी या लेकूरवाळ्या शकुंतला रेल्वेची चाके काळाच्या ओघात थांबली. मात्र मंगळवारचा दिवस यवतमाळकरांना खुशखबर देणारा ठरला.

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात यवतमाळ-मूर्तिजापूर शकुंतला रेल्वे ब्रॉडगेजचा अर्धा खर्च उचलण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. रेल्वेच्या बाबतीत यवतमाळकरांना दुहेरी बक्षीस मिळाले आहे. कारण, आज बुधवारी बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पाच्या वर्धा ते कळंब या मार्गावर रेल्वेसेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे आतापर्यंत एकाही ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर नसलेले यवतमाळ शहर चक्क दोन रेल्वे मार्गांवर झळकणार आहे.

हेही वाचा – चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड

खासदार भावना गवळी यांनी यवतमाळ-मूर्तिजापूर नॅरोगेज रेल्वे ब्रॉडगेजमध्ये परावर्तित करण्यासाठी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शिवाय शकुंतला रेल्वे विकास समितीकडूनही या प्रकरणी सातत्याने आंदोलन करून, निवेदन देवून पाठपुरावा करण्यात आला. त्याची दखल घेत राज्याच्या अर्थसंकल्पात शासनाने या रेल्वे मार्गासाठी ५० टक्के खर्च उचलण्याची घोषणा केली. सोबतच माहुर या शक्तीपीठाला जोडणाऱ्या वाशिम-आदिलाबाद या रेल्वेमार्गासाठीसुद्धा अर्धा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याने यवतमाळ चहूबाजूंनी रेल्वेच्या ट्रॅकवर येणार आहे.

हेही वाचा – नागपूर शहरात पुन्हा वाढला पिस्तुलांचा वापर

विदर्भात मुबलक पिकणारा कापूस मुंबई मार्गे मँचेस्टरकडे नेण्याच्या मूळ उद्देशाने ब्रिटिशांनी यवतमाळ ते मूर्तिजापूर हा नॅरोगेज रेल्वेमार्ग उभारला. पुढे या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. मध्य रेल्वेने प्रवासी रेल्वेची जबाबदारी स्वीकारली आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ मार्गावर शकुंतलेचा प्रवास सुरू झाला. शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी भावना गवळी यांनी मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले होते. यादरम्यान सदर रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी रेल्वे मंत्रालयाने दोन हजार १०० कोटींच्या खर्चाला मान्यता दिली. मूर्तिजापूर-यवतमाळ ही गाडी १० वर्षांपूर्वी बंद करण्यात आली. अनेकदा नागरिकांनी आंदोलन करून शकुंतला सुरू करण्याची मागणी केली. मात्र ट्रॅक सुस्थितीत नसल्यामुळे ही रेल्वे पुन्हा सुरू झाली नाही. दरम्यान केंद्रीय रेल्वेकडून या मार्गासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. आता राज्य शासनानेही अर्धा खर्च उचलण्याची घोषणा केल्याने लवकरच यवतमाळ मुंबईशी रेल्वेने जोडले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या प्रवाशांना रेल्वेने मुंबईला जायचे असल्यास ४५ किमी दूर धामणगावला जावे लागते. यवतमाळ-मूर्तिजापूर मार्ग तयार झाल्यास यवतमाळकरांची फरफट थांबणार आहे. शिवाय सर्वाधिक कापूस पिकविणाऱ्या या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कापसाची वाहतूक होणार आहे.