पर्यावरण- विकासाच्या उत्तम समन्वयाची ग्वाही नागपूर : पर्यावरण संवर्धन करताना विकासाचा खोळंबा होतो हा गैरसमज आहे. अनेक प्रकल्प उत्तम समन्वयातून यशस्वीरित्या साकारले आहे. त्यामुळे योग्य नियोजनातून व राजकीय तसेच अन्य व्यासपीठांवर पर्यावरणविषयक चर्चा घडवून आणल्यास मार्ग निघू शकतो. विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात ‘माझी वसुधंरा’ या मोहिमेचा सोमवारी विभागीय आढावा त्यांनी घेतला. बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जयस्वाल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, ‘माझी वसुधंरा’ अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे, विभागातील सहाही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर व चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त, नगर प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. पर्यावरणातील बदल बघता आता याचे पडसाद आपल्या दारात उमटायला लागले आहे. त्यामुळे पर्यावरणविषयक तात्काळ प्रतिसाद देण्याची हीच वेळ आहे. पुढच्या पिढीसाठी नाही तर आता आपल्या स्वत:साठी काम करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.