भ्रमणध्वनी, आधारकार्ड जोडणे आवश्यक

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : मालेगाव शहर कार्यक्षेत्रातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांचे भ्रमणध्वनी आणि आधार क्रमांक ३१ जानेवारीपर्यंत संलग्न करणे अनिवार्य आहे. ज्यांचे क्रमांक संलग्न होणार नाही त्यांना फेब्रुवारी महिन्यापासून धान्याचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी उपरोक्त प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रभारी धान्य वितरण अधिकारी पी. बी. मोरे यांनी केले आहे. जिल्ह्यत सर्वत्र हा निकष लागू राहणार आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारीपर्यंत करणे अनिवार्य असल्याचे पुरवठा विभागाने म्हटले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांचे आधारकार्ड आणि भ्रमणध्वनी संलग्न करणे आवश्यक आहे. याकरिता आपल्या रास्त भाव दुकानांचे ई पास यंत्रातील सुविधेचा वापर करून लाभार्थ्यांनी त्यांचे आधार, भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे. आधारक्रमांक सलग्न होईपर्यंत धान्याचा लाभ दिला जाणार नसल्याचेही  मोरे यांनी  नमुद केले.

जे रास्त भाव दुकानदार लाभार्थ्यांचे आधार क्रमांक संलग्न करण्याच्या कामात टाळाटाळ करीत असतील, अशा रास्त भाव दुकानदारांची तक्रार धान्य वितरण अधिकारी, मालेगाव शहर संपर्क (९७६४१८५८५५) पुरवठा निरीक्षण अधिकारी, नवापुरा  (९८२३९००२७९), इस्लामपुरा (७६२०६८१०२९), ओएसिस कंपनीचे तालुका प्रतिनिधी (९५७९९ ५५४४४) यांच्याकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.