शहरात टोळी तयार करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या कोष्टी टोळीचा म्होरक्या राकेश कोष्टीसह त्याच्या पाच साथीदारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या अन्य तीन गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांतर्गत ९२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तडीपाराचे आदेश दिले. राकेश कोष्टी (२६, विजयनगर, सिडको) याने पंचवटी भागात टोळी तयार करून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. वर्चस्व वादातून टोळीयुद्ध शहराने अनुभवले. परस्परांचा काटा काढण्यासाठी टोळ्यांकडून परस्परांना लक्ष्य करण्याचे प्रकार घडले. गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असणाऱ्या टोळ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी शहर पोलिसांनी तडिपारीचे अस्त्र उगारले आहे. राकेश कोष्टीसह जयेश उर्फ जया दिवे (२५, सिध्दी टॉवर, पंचवटी), आकाश जाधव (१९, अमर चौक, पंचवटी) आणि मयूर उर्फ मुन्ना कानडे (२३, शारदा सरस्वती सोसायटी, मेहरधाम, पंचवटी) यांना दोन वर्षांसाठी शहर आणि जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात आले आहे. कोष्टी टोळीतील अजय बागूल (रामवाडी) आणि किरण नागरे (३०, पार्वती निवास, जाणता राजा कॉलनी, मखमलाबाद) या दोघांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी शहर, जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात आले. दरम्यान, गंभीर स्वरुपाचे गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांच्या तडीपार प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात आली. त्या अंतर्गत बबी उर्फ प्रताप खोकाडियाला (१९, गणेशवाडी, पंचवटी) एक वर्षांसाठी, राहुल शिंदे (१९, भराडवाडी, फुलेनगर) आणि किरण शेळके (२६, महावीरनगर, पंचवटी) या दोन गुन्हेगारांना प्रत्येकी दोन वर्षांसाठी शहर, जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात आले. जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रातील ९२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.