नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भागांना दिलेल्या जोरदार तडाख्यात भात, टोमॅटो, मक्यासह फुलोऱ्यातील द्राक्ष, भाजीपाला आणि काढणीवर आलेल्या अनेक पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन दिवसांतील पावसात जिल्ह्यात भात वगळता फारसे नुकसान झाले नाही. परंतु, दिंडोरीचा पूर्व आणि चांदवडच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. पाणी साचून राहिल्याने लागवडयोग्य झालेल्या कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्यात सोमवारी पहाटे झालेल्या पावसाने भातशेती पाण्याखाली गेली. भाजीपाला सडल्याने शहरासह स्थानिक बाजारांमध्ये भाव कमालीचे कडाडले आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांपासून वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळत आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी काही भागात संततधार सुरू होती. काढणीवर आलेल्या खरीपातील अनेक पिके पावसाने भुईसपाट झाली. दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, चांदवडचा काही भाग, देवळा आणि परिसर आदी भागात दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. २४ तासात जिल्ह्यात २३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड या तालुक्यात अल्पकाळात २५ ते ३५ मिलिमीटर पाऊस झाला. येवला तालुक्यात ६४ मिलिमीटर पाऊस झाला. एक ते दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने भात, भाजीपाला, टोमॅटो, कांदा रोप, काढणीवर आलेला आणि काढून ठेवलेला मका अशा विविध पिकांचे नुकसान झाले. शेतांमध्ये पाणी साचले. टोमॅटोची झाडे आडवी झाली. फुले गळून पडली. काही भागात द्राक्ष बागा फुलोरा अवस्थेत असून गळकुज होण्याचा धोका वाढला आहे. बागा वाचविण्यासाठी रात्री उशिरा शेतकरी फवारणी करू लागले आहेत. फवारणीचा खर्च वाढल्याचे द्राक्ष उत्पादक अमोल बरकले यांनी सांगितले. करोनामुळे शेतकरी आधीच संकटात असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवल्याचे ते म्हणाले. कांदा लागवड करण्याच्या तयारीत असणाऱ्यांची वेगळी स्थिती नाही. कांद्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी तिप्पट, चारपट अधिक किंमत मोजून बियाणे खरेदी केले. लागवडयोग्य झालेली ही रोपे पावसात धुऊन निघाली. भाजीपाला आणि इतर पिकांचे नुकसान झाले. दिंडोरी तालुक्यातील जऊळके वणी, खेडगाव, शिंदवड, तिसगाव, तळेगाव, लोखंडेवाडी भागात तर चांदवड तालुक्यातील बहादुरी, िपपळनारे आदी भागातील शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला. देवळा तालुक्यात मका, भाजीपाल्याचे नुकसान झाले. जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी दोन दिवसात पावसामुळे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भातपिकाचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद केले. अन्य भागात फारसा पाऊस किं वा नुकसान झाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनामार्फत युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. स्थळभेटी करून प्राथमिक अंदाज वर्तविण्याची सूचना करण्यात आली आहे. महसूल आणि कृषी विभागामार्फत दिवसभर हे काम प्रगतिपथावर असल्याचे जिल्हा टंचाई शाखेकडून सांगण्यात आले. नवरात्रोत्सवात भाजीपाला महाग परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात भाजीपाल्याचे नुकसान झाल्याची परिणती घाऊक, किरकोळ बाजारात दर कडाडण्यात झाली आहे. किरकोळ बाजारात अनेक भाज्या महागल्या आहेत. काही भाज्यांचे दर किलोला १२० ते १५० रुपयांच्या घरात पोहचले आहेत. एरवी, नवरात्रौत्सवात उपवासामुळे भाजीपाल्याचे दर कमी होतात. यंदा मात्र त्या विपरित स्थिती आहे. घाऊक बाजारात भाजीपाल्यास चांगली किंमत मिळत आहे. बाजार समितीत नेहमीच्या तुलनेत आवक घटली. माल कमी असल्याने जादा भाव मिळत असल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात शेवगा, ढोबळी मिरची यासारख्या भाज्या १०० ते १२० रुपये किलो आहेत. घाऊक बाजारात टोमॅटोला दोन हजार रुपये प्रति क्विंटल, वांगी सहा हजार, फ्लॉवर ३७५० रुपये, कोबी २६२५, ढोबळी मिरची साडेसात हजार, कारले २५००, दोडका ४१६०, गिलके ४१६०, गवार तीन हजार, हिरवी मिरचीला पाच हजार रुपये भाव मिळाल्याचे नाशिक बाजार समितीकडून सांगण्यात आले. घाऊक बाजारात अनेक भाज्यांचे भाव ४० ते ६० रुपये किलो आहेत. किरकोळ बाजारात त्यांची दुपटीने विक्री होत आहे.