१२२ व्यक्ती आणि मुले यांना लाभ, दूरध्वनीद्वारे समुपदेशनही नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले असले तरी त्याचा फटका कामगार वर्ग, रोजंदारीवर काम करणारे मजूर, हातावर पोट असणाऱ्यांवर सर्वाधिक झालेला दिसून येत आहे. मालेगाव शहरात असे मजूर आणि कामगारांची संख्या अधिक असल्याने महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड तसेच यश फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मालेगाव, नाशिक शहर परिसरात एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या ११२ व्यक्ती आणि बालक यांना मदत पोहचविण्यात आली. करोनाचा कहर वाढत असतांना पुन्हा एकदा सर्वाना आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक उपाय करावे लागत आहेत. या काळात रोगप्रतिकार शक्ती प्रबळ राहणे अत्यंत महत्वाचे आहे. घरी रहाणे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला, आपल्या समुदायाला वाचविण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन हा एकच पर्याय आहे. या सर्व परिस्थितीत एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्ती आणि बालकांवर उपासमारीची वेळ येऊ नये आणि त्यांनी या परिस्थितीत त्यांचे आरोग्य सांभाळावे तसेच करोना संसर्गापासून बचाव करणे गरजेचे आहे. त्यासाठी महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड, यश फाउंडेशन यांच्या सहकार्याने नाशिक आणि, मालेगाव येथील ११२ एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्यांना जीवनावश्यक शिधा वाटप (तांदूळ , गहू, नागली, डाळ, मूग, मठ, चावळी, चणे, वाटाणा, काळी डाळ, सोयाबीन, शेंगदाणे, गूळ, तेल , साबण आदी) करण्यात आले. सामाजिक अंतर नियमांचे पालन यावेळी करण्यात आले. मुखपट्टीचा वापर , नियमित सॅनिटायझर, हात धुणे या नियमांचे पालन करून शिधा वाटप करण्यात येत आहे. ज्या व्यक्तीं आणि बालकांना आधीपासूनच एच.आय .व्ही. चा संसर्ग झालेला असेल, त्यांच्यात रोगप्रतिकार शक्तीची कमतरता या कारणांमुळे करोना प्रादुर्भाव होण्याचा जास्त धोका उद््भवू शकतो. एचआयव्ही असलेल्या सर्व व्यक्ती आणि बालकांसाठी अतिरिक्त खबरदारी घेतली जावी. संस्थेच्या वतीने करोना पासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीविषयी १५४ एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तीआणि बालकांना दूरध्वनीव्दारे समुपदेशन करण्यात आले. तसेच सध्या वाहन व्यवस्था बंद असल्याने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्ती व बालकांना जिल्हा शासकीय रुग्णालयला जाऊन एआरटी औषध आणण्यास अडचणी येत होत्या . अशा परिस्थितीत एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्ती व बालकांच्या एआरटीचे सातत्य राखण्यासाठी यश फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी त्यांना औषधी गोळ्यां घरपोच मिळण्यासाठी मदत केली. यावेळी महिंद्राचे अधिकारी तुषार जोशी, फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.