नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लागू के लेल्या टाळेबंदीमुळे शहरासह जिल्ह्य़ात शुक्र वारी रमजान ईद आणि अक्षय्य तृतीया हे सण साधेपणानेच साजरे करावे लागणार आहेत. ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण के ले जात असले तरी यंदा आपआपल्या घरीच नमाज पठण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय्य तृतीया हा एक असल्याने या दिवशी खरेदीचा मुहूर्त साधला जातो. परंतु, यंदा करोनामुळे खरेदीदारांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

टाळेबंदीमुळे सर्व दुकाने बंद असल्याने लोकांना खरेदीच्या उत्साहाला मुरड घालावी लागली आहे. रमजान ईदनिमित्त नवीन कपडे, खाद्यपदार्थ, सुका मेवा खरेदी करण्याकडे मुस्लीम बांधवांचा कल असतो. भद्रकालीसह जुन्या नाशिकमध्ये फळ विक्र ेत्यांनी टाळेबंदीतही विक्री सुरु ठेवली. मशिदींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दुसरीकडे, अक्षय्य तृतीयेला बहुतांश लोकांचा कल हा सोने खरेदी, वाहन, घर खरेदी करण्याकडे असतो. मागील वर्षांप्रमाणे यंदाही करोनाचे संकट कायम असल्याने तृतीयेचा सण घरात राहूनच साजरा करावा लागणार आहे.

सणाच्या पूर्वसंध्येला पूजेचे सामान बाजारपेठा बंद असल्याने फिरत्या विक्रेत्यांकडून ग्राहकांना चढय़ा दराने खरेदी करावे लागले. या दिवशी आमरसाचे महत्त्व अधिक असल्याने आंब्यांना मागणी असते. मागणी पाहून विक्रेत्यांनी हापूसच्या नावाखाली कर्नाटक तसेच इतर भागातील आंबा १०० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी मारला. लालबाग, के शरचा दरही अधिक होता. रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली दरवर्षी कर्नाटकातील हापूस विकण्याचे प्रकार होत असल्याने ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून शहरातील काही संस्थांकडून थेट कोकणातील शेतकऱ्यांकडील हापूस विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाइन मागणी नोंदविल्यावर घरपोच कोकणातील हापूस मिळत असल्याने ग्राहकांचा या सेवेस प्रतिसाद मिळाला.

टाळेबंदीतही ग्राहकांची सोने-चांदी दागिने खरेदीची हौस पूर्ण करण्यासाठी सराफ व्यावसायिकांनी ऑनलाइन खरेदीची व्यवस्था केली आहे. याविषयी सराफ व्यावसायिक चेतन राजापूरकर यांनी भूमिका मांडली. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. त्या दृष्टीने ग्राहकांनी घरबसल्या ई-गोल्ड सोने नोंदणी करून सोने किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले. टाळेबंदीमुळे वास्तू खरेदीसह अन्य खरेदीला अडथळे आले आहेत. दुकानेच बंद असल्याने वाहन खरेदीवरही परिणाम होणार आहे. खान्देशात अक्षय्यतृतीया म्हणजेच आखाजीला महिला आपल्या माहेरी जातात. परंतु, यंदा टाळेबंदीमुळे प्रवासावर निर्बंध असल्याने आहे त्याच ठिकाणी त्यांना सणाचा आनंद मानावा लागणार आहे.