शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने येथे आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय खाशाबा जाधव करंडक कुस्ती स्पर्धेस उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते तर आ. सीमा हिरे, क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. रविवारी सायंकाळी ५ वाजता शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा समारोप होईल. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे नाशिकमध्ये प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत कोल्हापूर, नगर, पुणे ग्रामीण व शहर, सोलापूर, सांगली, सातारा, नाशिक व लातूर, पिंपरी चिंचवड, ठाणे, भंडारा येथील ३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यात विविध वजनी गटांत फ्री स्टाइल, ग्रीको रोमन या प्रकारात स्पर्धा होत असून महिला संघांनी यात सहभाग घेतला आहे. या वेळी महापौर मुर्तडक यांनी स्पर्धेच्या निमित्ताने नाशिकच्या कुस्ती परंपरेला उजाळा मिळाल्याचे नमूद केले. नाशिक हे एकेकाळी कुस्तीगिरांचे प्रमुख ठिकाण ओळखले जात असे. त्या दृष्टीने आजही काम सुरू असले तरी एकही खेळाडू आजपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत चमकलेला नाही. याचा विचार करण्याची गरज मुर्तडक यांनी अधोरेखित केली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या प्राथमिक फेरीत ५७ किलो गटात नितीन गायकर (नाशिक), ६५ किलो गटात तानाजी दाताळ (अहमदनगर), विष्णू तात्पुरे (लातुर), ४८ किलो वजनी गटात राजेश्री गायकवाड (ठाणे शहर), ५८ किलो गटात अंकिता शिंदे (कोल्हापूर), अंजली पाटील (सांगली) हे विजेते ठरले.