नैराश्य, प्रेमप्रकरण, कुटुंबाकडून दुर्लक्षामुळे घरातून पलायन ‘मुलीची जात’ असे म्हणत कधी तिला गरजेपेक्षा जास्त जपले जाते, तर कधी दुर्लक्ष करत सोयीस्करपणे टाळले जाते. टोकाच्या दोन्ही प्रवृत्तींना तोंड देणाऱ्या अल्पवयीन मुली या प्रकाराला कंटाळत घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. नैराश्य, घरातील वातावरण तसेच प्रेम प्रकरण अशा काही कारणांमुळेही अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. जिल्ह्य़ातून मागील वर्षी १८१ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यातील १५३ मुली घरी परतल्या, तर २८ मुलींचा शोध सुरू आहे. नाशिक शहरात १६३ अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत आहे. यातील १५० मुली घरी परतल्या, तर १३ मुलींचा ठावठिकाणा लागलेला नाही. ‘ऑपरेशन मुस्कान’ किंवा अन्य उपक्रमाद्वारे अपहरण झालेल्या बालकांचा शोध सुरू असतो. शारीरिक अत्याचारास अल्पवयीन मुली बळी पडतात. काहींनी ‘सैराट’सारखा चित्रपट पाहून स्वखुशीने हा मार्ग पत्करला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ग्रामीण भागात पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नकळत्या वयात कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार सांभाळावा लागतो. मुली ओळखीतील एखाद्या मुलाची आयुष्याचा साथीदार म्हणून निवड करतात. घरचे विरोध करतील या भीतीने घर सोडून पलायन करतात. पालकांना कल्पना नसल्याने पोलीस ठाण्यात अपहरण अशी नोंद होते. तपासात या मुली संबंधित मुलासोबत स्वखुशीने लग्न न करता राहत असतात. त्यांची वाटेल ते करण्याची तयारी असते. वयाच्या अवघ्या १३-१४ व्या वर्षी त्यातील काही कुमारी माता झाल्याची उदाहरणे आहेत. अशा मुलींचा स्वीकार करण्यास पालक तयार नसतात, तसेच काही वेळा मुली घरी जाण्यास तयार नसतात. या पाश्र्वभूमीवर, पोलीस त्या मुलीची रवानगी निरीक्षण गृहात करतात. त्या सज्ञान झाल्या की, त्यांना संबंधित मुलासोबत अध्र्यावरती मोडलेला संसार पुन्हा मांडण्याची संधी मिळते. त्यात किती जणींना यश मिळाले याची ठोस माहिती नाही. शहर परिसरात पालकांच्या सुरक्षित वातावरणाला कंटाळत काही ‘थ्रिल’ अनुभवयाचे या भ्रामक कल्पनेने काही मुली घर सोडतात. वेगवेगळे चित्रपट, मालिकांमधील नायिकांचे अनुकरण, अवास्तव अपेक्षांच्या मागे त्या धावत असल्याचे तपास यंत्रणेचे निरीक्षण आहे. पालकांचा अभ्यासासाठी सातत्याने होणारा तगादा आणि वेळेचे बंधन याला काही मुली कंटाळतात. कधी प्रेम प्रकरणात भूलथापांना बळी पडत बाहेरचा रस्ता त्यांना जास्त जवळचा वाटत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर हे प्रमाण निकाल तसेच नैराश्येच्या भावनेतून वाढते. पाच ते सात वर्षांची लहान मुले खाऊ किंवा अन्य भूलथापांना बळी पडतात. ही बालके भिकाऱ्यांच्या टोळीकडून अथवा बाळाची आस असणाऱ्या निपुत्रिक दाम्पत्यांकडून पळवली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रेमप्रकरणातून सर्वाधिक पलायन जिल्ह्य़ातून वर्षभरात ३६४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यातील १५३ मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले. काही मुली स्वखुशीने घरी परतल्या. घरातून पलायन करण्यामागे बहुतांश प्रकरणात नकळत्या वयातील प्रेमप्रकरणाची जोड आहे. बहुतांश मुली आदिवासी तसेच गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसल्याने आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर त्या निघून जातात. पालकांची तक्रार असल्याने शोधचक्र सुरू असताना त्या वीटभट्टी, हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करताना आढळतात. काहींना पालक स्वीकारतात, तर काही पालकांकडे पुन्हा जाण्यास तयार नसतात. शहरात भ्रामक कल्पना, नायक-नायिकांचे अनुकरण तसेच ‘तुझ्यासाठी काय पण.’ म्हणत १५ ते १७ वर्षांतील लहान मुली घर सोडून पळून जात असल्याचे चित्र आहे.