वेतनवाढीच्या करारावरील आक्षेप आणि आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेसच्या वतीने (इंटक) गुरुवारी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागला. या आंदोलनाची पूर्वकल्पना नसल्याने विद्यार्थ्यांसह चाकरमाने, प्रवाशांचे अतोनात हाल झाले. काहींना ऐनवेळी रजा घेणे भाग पडले तर काहींना जादा बसभाडे देऊन इच्छित ठिकाणी पोहोचावे लागले. प्रवाशांच्या असहायतेचा फायदा खासगी वाहनधारकांनी घेत अक्षरश: त्यांची लूट केली. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने या बंदला शहर परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार हे शासकीय व इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा कमी आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची वैद्यकीय खर्च, पाल्यांचे शैक्षणिक खर्च, विवाह, कौटुंबिक अडी अडचणींची सोडवणूक करताना दमछाक होते. गेल्या काही महिन्यांत चार कर्मचाऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळत आत्महत्या केली. तर एका वाहनचालकाने महामंडळाकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. या बाबत स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या निवडणूक जाहीरनाम्यात मान्यता प्राप्त कामगार संघटनेने सहावा वेतन आयोगापेक्षा अधिक वेतन मिळवून दिल्याचा खोटा दावा केला. मात्र अद्याप त्या दृष्टीने काहीच हालचाल नाही. याबाबत निदर्शने, आंदोलन, कामबंद, उपोषण वा संप करणार नाही असे मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी लिहून दिले आहे. संघटना त्यांच्या स्वार्थासाठी व संघटनेच्या फायद्यासाठी प्रशासनाची संगनमत करून बेकायदेशीरपणे काम करत असल्याचा आरोप इंटकने केला. एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी अशी इंटकची मागणी आहे.

राज्य शासन व परिवहन महामंडळाच्या असंवेदनशीलतेचा निषेध, कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू करावी, महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार सोयी सवलती द्याव्यात, प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करावी आदी मागण्यांसाठी इंटकने काम बंदचे हत्यार उपसल्याचे राज्य कार्याध्यक्ष मुकेश तिगोटे यांनी सांगितले. संपात सहभागी होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना धमकाविण्यात आले. मात्र सनदशीर मार्गाने लढा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात वाहक व चालक सहभागी झाल्यामुळे जिल्ह्य़ातील बससेवा विस्कळीत झाली. महामार्ग, सीबीएस, ठक्कर बझार आदी स्थानकांवर इंटकच्या सदस्यांनी बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल झाले. आंदोलनात इंटक वगळता अन्य संघटना सहभागी न झाल्यामुळे काही मार्गावर नियमितपणे बससेवा सुरू होती. परंतु, आंदोलक ती बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत होते.

बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसला स्थानकाऐवजी दुसऱ्याच ठिकाणी उतरविण्यात आले. काहींनी प्रवाशांनी भरलेल्या बसेस पुन्हा आगारात नेण्यास भाग पाडले. या बसगाडय़ा प्रवाशांना उतरवून रिकाम्या करण्यात आल्या. काहींनी दगडफेकीची धमकी दिल्याने स्थानकात तणावाचे वातावरण राहिले. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा फायदा खासगी वाहनधारकांनी उचलला. दामदुप्पट, तिप्पट भाडे आकारून खासगी वाहनधारकांनी प्रवाशांची लूट केली. काहींनी गावाला जाण्याचे बेत रद्द करून घर गाठले. बाहेरगावाहून येणारे व निघालेल्या अनेकांचे हाल झाल्याने त्यांना स्थानकात प्रतीक्षा करावी लागली.

एसटी महामंडळाने आश्वासन पाळायला हवे

संगमनेर येथील एका महाविद्यालयात आपण काम करतो. संपाविषयी कळले होते. मात्र महामंडळाने बससेवा सुरू राहील असे आश्वासन दिल्यामुळे गुरुवारी नेहमीप्रमाणे बसस्थानकावर सकाळी आठ वाजता आलो. मात्र अकरा वाजून गेले तरी एकही बस मिळाली नाही. आपले व्याख्यान होते. आपण जाऊ न शकल्याने २०० जणांचे प्रशिक्षण अपूर्ण राहिले. पर्यायाने ते शासनाचेही नुकसान आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असतील. पण प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. वेळ वाया गेला पण झालेले नुकसान भरून येण्यासारखे नाही. मंडळाने आपले आश्वासन पाळायला हवे होते.
मनोज आहेर (दृष्टीबाधित, नोकरदार)

विनाकारण घरी बसावे लागले

गुरुवारी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी मेळा बसस्थानकावर आलो. साधारणत: २००-३०० विद्यार्थी बसची वाट पाहत होते. स्थानक परिसरात बसच्या लांबच लांब रांगा लागल्या. पण एकाही बसमध्ये प्रवाशांना चढू दिले नाही. सर्वाना ताटकळत उभे राहावे लागले. आम्ही ११ वाजेपर्यंत तसेच उभे होतो. खासगी वाहने वारेमाप पैसे मागत होते. परत येताना हाच त्रास होईल म्हणून शेवटी नाइलाजाने आम्हाला घरी परत यावे लागले.

संदीप ठाकरे (विद्यार्थी, संदीप तंत्रनिकेतन महाविद्यालय)