नाशिक: आरोग्यसेवा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या १०८ या रुग्णवाहिकेने करोनाच्या सावटातही अखंड सेवा दिली. २२ हजारांपेक्षा अधिक करोना रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून आतापर्यंत दोन लाखांहून अधिक रुग्णांना या सेवेचा फायदा झाला आहे. करोनाचा संसर्ग सुरू होऊन दोन वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. याचा विपरीत परिणाम आरोग्य व्यवस्थेवर झाला. करोना सावटामुळे आरोग्य सेवा करोना या विषयावर केंद्रित झाली असताना अन्य रुग्णांना आरोग्य सेवा मिळविताना अडचणी आल्या. अशा काळात आरोग्य विभागाच्या १०८ या रुग्णवाहिकेने रुग्णाला तातडीने आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जिल्ह्यात अॅडव्हान्स लाइफ सर्पोटच्या ११ आणि बेसिक लाइफ सर्पोटच्या ३५ अशा ४६ रुग्णवाहिका आहेत. मागील तीन वर्षांचा विचार केल्यास २०२० मध्ये १८,२९२ तर २०२१ मध्ये तीन हजार ८८२ आणि २०२२ मध्ये ११५ अशा २२, २८९ करोना रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. याशिवाय अपघात, जळणे, हृदयरोग, उंचावरून पडणे, विषबाधा, प्रसूती, वीज चमकणे किंवा विद्युत धक्का, वैद्यकीय, आत्महत्या अशा घटनांमधील रुग्णांसह इतरांनाही ही सेवा देण्यात आली. जिल्ह्यात पाच वर्षांहून अधिक काळापासून ही सेवा अविरत सुरू असून आदिवासी भागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांच्या दुर्गम भागातही रुग्णवाहिका पोहचल्याने अनेकांना आरोग्य सेवा मिळणे सोपे झाले आहे.