शेतकरी, शेतमजुरांसह शासनाचीही फसवणूक, १६ जणांविरुद्ध गुन्हा नाशिक : कृषी अधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ स्वत:च पदरी पाडून घेत १४७ शेतकरी आणि शेतमजुरांची फसवणूक करीत सु्मारे ५० कोटींचा घोटाळा केल्याचा प्रकार जिल्ह्यातील पेठ तालुक्यात उघडकीस आला आहे. पेठ पोलीस ठाण्यात संशयित १६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठ तालुक्यातील हेदपाडा (एकदरे) येथील शेतकरी योगेंद्र उर्फ योगेश सापटे यांनी केलेल्या तक्रारीमुळे हा घोटाळा उघड झाला आहे. २०११ मध्ये कृषी विभागासाठी असलेल्या एका शासकीय योजनेचा ठेका मिळावा म्हणून सापटे यांनी अर्ज केला होता. त्यानुसार सपाटे यांच्याकडून निविदा भरुन घेण्यात आली. १०० रुपयांच्या कोऱ्या मुद्रांकावर तिकीट लावून कोऱ्या ५० पावत्या आणि कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी घेण्यात आली. सापटे यांना काम दिले गेले. परंतु, २०११ ते २०१७ या कालावधीत त्यांच्या खात्यावरून परस्पर तीन कोटी, १७ लाख, चार हजार ५०४ रुपये काढून घेण्यात आले. कृषी अधिकाऱ्यांनी विविध योजनांचा निधी लाटून शासनाचीही फसवणूक केली. या प्रकरणी सापटे यांनी पेठ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत १४७ शेतकरी आणि शेतमजुरांना फसविले गेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी १६ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठचे पोलीस निरीक्षक दिवार्णंसग वसावे यांनी या प्रकरणाची व्याप्ती ५० कोटींच्या पुढे असल्याने नाशिक ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केल्याचे सांगितले. या घोटाळ्यात तत्कालीन कृषी अधिकारी सरदार्रंसग राजपूत, एम. बी. महाजन यांसह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक पेठ तालुक्यात आदिवासी समाजासाठी वेगवेगळ्या शासकीय योजना राबविण्यात येतात. आदिवासींना गावातच काम मिळावे यासाठी दगडी बांध आणि पाणलोट बांध योजना आहेत. या योजनांसाठी मिळालेला निधी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकरी, शेतमजुरांकडून कागदपत्रे मिळवून आणि बनावट कागदपत्रे सादर करुन लाटल्याची तक्रार आहे. २०११ ते २०१७ या कालावधीत कामावर तसेच मजुरांवर कोणताही खर्च झाला नसल्याचे म्हटले आहे. योगेश सपाटे यांच्या तक्रारीनुसार शेतकरी, शेतमजुरांची ५० कोटींना कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी फसवणूक केली आहे. २०११-२०१७ या कालावधीतील हा प्रकार असून १६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामाचा मोबदला दिला गेला नाही, कामे न करताच त्याची देयके काढण्यात आली, अशी तक्रार आहे. तक्रारदाराची संख्या सध्या एक असली तरी गुन्ह्याची व्याप्ती पाहता ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. संशयित हे तत्कालीन कृषी अधिकारी, कर्मचारी आहेत. यातील काही सेवानिवृत्त तर, काही मयत आहेत . - सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक जिल्हा