सह्याद्री संवाद व्याख्यानमालेत संदीप वासलेकर यांचा इशारा नाशिक : ग्रामीण भारतातच देशाचे भविष्य घडणार असून ग्रामीण भागाचा आणि अर्थात शेतीचा आगामी काळात विकास कसा होतो त्यावर भारताचे भवितव्य अवलंबून आहे. ग्रामीण भागाचा विकास मागे ठेवून शहरकेंद्रित आधुनिक अर्थव्यवस्थेचा कितीही विस्तार झाला तरी ती सर्व प्रगती पोकळ असेल. सह्याद्री फार्मर्ससारखे प्रकल्प देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात उभे करणे हा त्यावरचा उपाय आहे, असे मत स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांनी व्यक्त केले. ग्रामीण भाग दुर्लक्षित झाला तर असंतोष निर्माण होऊन ते राजकीय दृष्टिकोनातून घातक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला. मोहाडी येथे सह्याद्री फार्मर्स प्रोडय़ुसर कंपनी आयोजित सह्याद्री संवाद या व्याख्यानमालेत वासलेकर यांनी मार्गदर्शन केले. स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपच्या कार्यकारी संचालक इल्मास फतेहअली, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी सचिन इटकर, सह्याद्री फाम्र्सचे अध्यक्ष विलास शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. पुढील दोन दशकांत सह्याद्रीचा विस्तार जगभर होईल, असा विश्वास वासलेकर यांनी व्यक्त केला. २० वर्षांपूर्वी तत्कालीन भारत सरकारसाठी आम्ही भारताच्या भवितव्याचा पुनर्विचार हा अहवाल तयार केला होता. त्यात ग्रामीण भागाचे महत्त्व अधोरेखित केले होते. प्रामुख्याने ग्रामीण भारताची भरभराट, सर्व देशात कमीतकमी एक हजार कृषिकेंद्रित समूह केंद्र तयार करणे,किमान ५०० जिल्ह्यांत त्याचा विस्तार करणे या प्रमुख बाबी त्यात होत्या. आमच्या संकल्पनेला सह्याद्री फार्मर्सने मूर्त स्वरूप दिले आहे. पुढील १० वर्षांच्या काळात अशी ग्रामीण विकास समूह केंद्रे निर्माण झाली नाही तर देशाचा विकास परिपूर्ण नसेल. तो एकांगी असेल. त्यातून विषमता निर्माण होईल आणि तो राजकीयदृष्टय़ा घातक ठरेल, असा इशारा वासलेकर यांनी दिला. जगातील एकूण गोडय़ा पाण्यापैकी सरासरी ८० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. उद्योग, पिण्यासाठी, वीज निर्मिती आणि वापरासाठी उरलेले २० टक्के पाणी वापरले जाते. अमेरिका, युरोपसारख्या प्रगत देशांनी शेतीच्या पाण्याचा वापर ६० ते ७० टक्क्यांवर आणला आहे. भारतात मात्र ते प्रमाण ८० टक्के आहे. जगाच्या ७०० कोटींपैकी १०० कोटी लोकांना पिण्याचे धड पाणी मिळत नाही. २०० कोटी लोकांना संडाससाठी पाणी नाही. शेतीसाठी जगभर केवळ तीन टक्के क्षेत्रावर ठिबक किंवा सूक्ष्म सिंचनाचा वापर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद राजेभोसले यांनी वासलेकर यांचा परिचय करून दिला. सुरेश नखाते यांनी सूत्रसंचालन केले. आबासाहेब काळे यांनी आभार मानले.