आचारसंहिता आणि मार्चअखेरीचा फटका बसणार

आरोग्य विभागाच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची प्रक्रिया यंदा विलंबाने सुरू झाली आहे. आचारसंहिता तसेच मार्चअखेर या कारणांचा फटका या प्रक्रियेला बसणार असल्याने ही प्रक्रिया रखडण्याची चिन्हे आहेत.

माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्रजनन आणि बाल आरोग्यविषयक सेवा अधिक प्रभावी देणे, कुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी आणि लोकसहभागातून आरोग्यविषयक कार्यक्रम यशस्वी करणे यासाठी जे सरकारी रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी झटतात त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना ‘डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालये, खासगी संस्थांना या योजनेत सहभागी होता येते.

नाशिक जिल्ह्य़ातून दोनशेपेक्षा अधिक आरोग्य संस्था यामध्ये सहभागी होतात. ऑक्टोबर महिन्यात आरोग्य विभागाकडून या कामास सुरुवात होणे अपेक्षित असतांना केंद्र स्तरावरून या योजनेला महत्त्व न दिल्याने उपक्रमास मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरुवात झाली.

केंद्र स्तरावरून आरोग्य विभागाला मार्चच्या पहिल्या आठवडय़ात पत्र प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या हालचालींना वेग आला आहे.

जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती यांच्यासह अन्य १० सदस्यांचा समावेश असलेली समिती गठित झाल्यानंतर उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येतील. ही समिती कुटुंब कल्याण आणि प्रजनन, बाल आरोग्य कार्यक्रमात केलेले काम, स्वच्छता, टापटीपपणा, गुणवत्ता, लोकांच्या प्रतिक्रिया याआधारे गुणदान करणार आहे.

मार्गदर्शन मागविले

पाच महिने उशिराने पुरस्कार योजनेच्या कामास सुरूवात होताच आचारसंहिता लागू झाली. यामुळे जिल्हा समितीमध्ये असणारे आरोग्य सभापती, महिला बाल कल्याण सभापती यांचा समितीमधील सहभाग आचारसंहितेचा भंग करणारा ठरू शकेल काय, याबाबत आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. वर वर्ग करत खर्चाचे विश्लेषण देणे अपेक्षित आहे.