नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली, त्यांचे श्रेष्ठी दिल्लीत आहेत, तर शिवसेनेचे श्रेष्ठी मुंबईत, मातोश्रीवर आहेत. मंत्रिमंडळ निश्चितीसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीला गेला नाही. बंडखोर गटाचे मुखवटे आपोआप गळून पडत असून पूर्वाश्रमीचे शिवसैनिक एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, असे टीकास्त्र शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी सोडले.

ठाकरे सरकार गेल्यानंतर बेळगावसह सीमावासीय मराठी जनतेवर दडपशाही वाढली आहे.  केंद्रात भाजपचे राज्य आहे. बेळगावसह सीमा भागाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. तोपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी करून आणावा, असे आव्हान त्यांनी दिले. दिल्लीत शिवसेनेच्या काही खासदारांची बैठक होऊन विचारांचे आदानप्रदान झालेले असू शकते. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार होत्या, तेव्हा शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील.