पहिल्या महिन्यात बरीच प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने दुसऱ्या म्हणजे जुलै महिन्यात अनेक तालुक्यांमध्ये हजेरी लावली असली तरी दमदार स्वरुपात तो बरसलेला नाही. मागील २४ तासात ३१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात ४५३६.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. इगतपुरीत सर्वाधिक तर सर्वात कमी पाऊस देवळा तालुक्यात झाला आहे. काही तालुके अद्याप त्याच्या परिघात समाविष्ट झालेले नाहीत. यामुळे अनेक धरणांमध्ये अपेक्षित जलसंचय झालेला नाही. यंदाच्या हंगामात पावसाचे वेळेवर आगमन झाले. दोन ते तीन दिवस हजेरी लावणारा पाऊस नंतर अनेक भागातून अंतर्धान पावला. पहिल्या पावसात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले. सलग १५ ते २० दिवस ओढ देणाऱ्या पावसाचे जूनच्या अखेरीस काही तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले. जुलैच्या प्रारंभापासून संततधार स्वरुपात तो कोसळत आहे. सलग दोन दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी काहिशी विश्रांती घेतल्याचे पहावयास मिळाले. नाशिक शहरात या दिवशी सूर्यदर्शनही झाले. अधुनमधून पावसाची सर येत होती. ग्रामीण भागात काही ठिकाणी यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. मागील चोवीस तासात जिल्ह्यात ३१२ मिलिमीटर पाऊस झाला. आतापर्यंतच्या पावसाचा तालुकानिहाय आढावा घेतल्यास ४५३६.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यात सर्वाधिक ९९५ मिलिमीटर पाऊस इगतपुरीमध्ये तर सर्वात कमी पाऊस देवळा तालुक्यात सर्वात कमी ९६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नाशिक तालुक्यात ४४५ मिलिमीटर, त्र्यंबकेश्वर ६६९, दिंडोरी १४५, पेठ ५४४, निफाड ११४, सिन्नर १६२, चांदवड १९६, देवळा ९८, येवला ११९, नांदगाव २०३, मालेगाव १३६, बागलाण ११६, कळवण १४२, सुरगाणा ४४९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, सुरगाणा व पेठ या तालुक्यात स्थिती तुलनेत चांगली असली तरी देवळा, येवला, मालेगाव, बागलाण, कळवण, निफाड, दिंडोरी या तालुक्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. काही धरणांमध्ये अद्यापही अल्पसाठा जिल्ह्यातील चार ते पाच तालुकेवगळता इतरत्र दमदार पाऊस नसल्याने धरणातील जलसाठा वाढण्यास मर्यादा आल्याचे दिसत आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये काहीअंशी जलसाठा वाढण्यास मदत झाली. त्यात नाशिकला पाणी पुरवठा गंगापूर धरणात सध्या २११५ (३८ टक्के), काश्यपी ५२५ (२८), गौतमी गोदावरी ३२३ (१७), आळंदी ६४ (७) जलसाठा आहे. दारणा धरणात ३६६६ (५१), भावली ६७७ (४७), मुकणे ३२६ (५), वालदेवी १३८ (१२), कडवा ३८७ (२३), नांदूरमध्यमेश्वर २१० (८२) असा जलसाठा आहे. दारणा धरणातून विसर्ग करण्यात आला. पालखेड धरण समूह व गिरणा खोऱ्यातील धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. पालखेड धरणात ८१ (१२), करंजवण ३०६ (६), वाघाड ८८ (४), ओझरखेड २९९ (१४), चणकापूर ६३१ (२६), हरणबारी १४७ (१३), केळझर ३९ (७), गिरणा ४८४५ (२६), पुनद ४३३ (३३) असा जलसाठा आहे. माणिकपुंज, भोजापूर, तिसगाव, पुणेगाव नागासाक्या ही धरणे आजही कोरडी आहेत. अशी स्थिती असली तरी गतवर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये अधिक जलसाठा आहे. जिल्ह्यातील २४ लहान-मोठय़ा धरणांमध्ये १५ हजार ३०० दशलक्ष घनफूट अर्थात २३ टक्के जलसाठा आहे. मागच्या दुष्काळी वर्षांत हे प्रमाण केवळ २२२० दशलक्ष घनफूट म्हणजे तीन टक्के होते.