कुसुमाग्रज नगरी नाशिक : टाळ मृदुगाचा गजर..विणेकऱ्यांचा नाद..लेझीमच्या ठेक्यावर धरलेला ताल.. पुष्पवृष्टी..स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रांगोळय़ा अशा उत्साहपूर्ण वातावरणात शुक्रवारी येथे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. शहरातील २० शाळांमधील एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ही खरे तर विद्यार्थी दिंडीच ठरली. शैक्षणिक संस्था वगळता इतर संस्थांनी दिंडीकडे पाठ फिरवली. ग्रंथदिंडी अभूतपूर्व व्हावी यासाठी संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या वतीने वेगवेगळय़ा संस्थांशी संपर्क साधत प्रयत्न करण्यात आले. चित्ररथाचे नियोजन झाले, परंतु, बुधवारी आलेल्या अवकाळी पावसाने या नियोजनावर पाणी पडले. त्यामुळे ग्रंथदिंडी मार्गात बदल करण्यात आला. कुसुमाग्रज निवासस्थानापासून ग्रंथदिंडी सुरु झाली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यावेळी उपस्थित होते. विज्ञान चित्ररथ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ग्रंथ संपदा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची माहिती देणारा चित्ररथ हे दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले. दिंडीत नाशिक सायकलिस्ट संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. विठ्ठल रखुमाई, वासुदेव, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची वेशभुषा केलेले काही जण दिंडीत होते. पर्यावरण रथातून पर्यावरण संवर्धनविषयी प्रबोधन करण्यात आले. लेझीम पथकाच्या ठेक्यावर ताल धरण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. दिंडीत प्रथमच पोलीस विभागाने सहभाग घेत वाहतूक नियमांविषयी प्रबोधन केले. महिला ढोलपथकाने लक्ष वेधून घेतले. मोजक्याच साहित्यिकांचा दिंडीत सहभाग राहिला. ग्रंथ दिंडी परशुराम साईखेडकर नाटय़ मंदिराजवळ आल्यानंतर दिंडी बसने आडगावस्थित कुसुमाग्रजनगरीपर्यंत गेली. त्या ठिकाणी स्वागताध्यक्ष भुजबळ, प्रा.ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर दिंडीचा समारोप झाला.