मालेगाव शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये होणाऱ्या जनावरांच्या कत्तलीनंतर रक्त मिश्रित पाणी थेट मोसम नदीपात्रात येत असल्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची तक्रार सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. रक्तमिश्रित पाणी थेट नदीपात्रात येत असल्यासंदर्भातील एक चित्रफितदेखील निवेदनासोबत मुख्यमंत्र्यांना पाठवली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी दिली आहे. हेही वाचा >>>जळगाव जिल्हा दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ; तीन नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार; दहा डिसेंबर रोजी मतदान कत्तलखान्यांमध्ये केल्या जाणाऱ्या जनावरांच्या कत्तलीनंतर रक्त मिश्रित पाणी गटारींमध्ये सोडले जाते. त्यानंतर हे पाणी थेट मोसम नदी पात्रात येते. गटारी तुंबल्यामुळे काही वेळा हे पाणी रस्त्यावरून वाहत जाते. गेल्या रविवारी येथील सांडवा पुल भागात तब्बल तीन तास असेच रक्तमिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत होते याकडे लक्ष वेधत शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यासंदर्भात आजवर अनेकदा तक्रारी करूनही काही उपयोग होत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. हेही वाचा >>>सुषमा अंधारेंच्या सभेपूर्वीच गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील स्वागतफलक गायब – ठाकरे गटातर्फे पोलिसांकडे तक्रार मोसम नदी पात्राचे पाणी पुढे गिरणा नदीत आणि नंतर गिरणा धरणात जाते. गिरणा धरणावर मालेगावसह अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. या रक्तमिश्रीत पाण्यामुळे दुर्गंधी व डास मच्छरांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र याप्रश्नी पालिका व पोलीस प्रशासन अनास्था दाखवत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. शहरातील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस होणारा अडथळा,अवैध धंद्यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास याकडेही निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न समितीने केला आहे.