नाशिक : प्रभाग रचनेच्या हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होण्याच्या प्रतिक्षेत असताना ही संपूर्ण प्रक्रिया रद्द झाल्यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता नव्याने प्रभाग रचना होणार असल्याने पुन्हा काही भागांची मोडतोड वा काही क्षेत्र कमी-अधिक होण्याची भीती आहे. परिणामी, मध्यंतरी जाहीर झालेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रचाराला लागलेले आजी-माजी नगरसेवक आणि इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वत:कडे घेत शासनाने नव्याने प्रभाग रचना करण्याचे निश्चित केले. त्याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झाली आहे. महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायतीतील प्रभागरचना रद्द करण्यात आली. उपरोक्त ठिकाणी प्रभाग रचना, हद्दी निश्चित करण्याची प्रक्रिया नव्याने करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे नाशिकसह अन्य महापालिकेच्या प्रभागरचना रद्द झाल्या आहेत. शासनाच्या निर्णयानुसार यापूर्वी महापालिकेने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला होता. फेब्रुवारीच्या प्रारंभी ४४ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर झाली होती. त्यावरील हरकती व सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल अशी स्थिती होती. सर्वसाधारणपणे प्रस्तावित रचनेत फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे बहुतेकांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला असताना उपरोक्त निर्णयाने त्यांनाही धक्का बसला आहे. सहाव्या पंचवार्षिकची मुदत संपुष्टात आल्याने महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. याच सुमारास जाहीर झालेली प्रभाग रचना गुंडाळली जाण्याच्या मार्गावर आहे. अर्थात, त्याबाबत निवडणूक आयोग वा राज्य शासनाने कुठलीही सूचना केलेली नाही. प्रचार करावा तर कुठे ? ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या. या निमित्ताने प्रचाराला अधिक वेळ मिळाल्याचे मानून इच्छुकांनी भेटीगाठी वाढविल्या असताना प्रभाग रचना रद्द झाल्यामुळे कुठे प्रचार करावा, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. कारण, नव्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल झाल्यास सध्याच्या प्रचाराचा उपयोग होईल की नाही, याची इच्छुकांना चिंता आहे.