शहरासह जिल्ह्य़ात वृक्षारोपणाचे कार्यक्रम जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहर परिसरात मंगळवारी वृक्षारोपणाचा एककलमी कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध पर्यावरण प्रेमी संस्थांच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. शाळांमधून पर्यावरण दिनानिमित्त माहिती देण्यात आली. आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीने सकाळी सातपासूनच देवराई येथे ‘वेलीचे जंगल’ उपक्रमास सुरूवात झाली. दयाळ, वेली सोनचाफा, माधवीलता, मधुनशी, कावनी, कुसर, ताण, भीमाचा वेल, आगातिक, लामकणी, सौरंगा, सप्तरंगी आदी रानवेली यावेळी लावण्यात आल्या. यासाठी आयुर्विमा महामंडळ, युनियन बँक यासह वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, ब्लॉसम, सेंट फ्रान्सिस, रायन शाळेच्या विद्यार्थ्यांसह पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी वन अधिकारी प्रशांत खैरनार, पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड, अमोल पाटील आदी उपस्थित होते. या ठिकाणी संस्थेचे शेखर गायकवाड यांच्या वतीने अभिनव अशी अभ्यासिका आकारास आली आहे. ही अभ्यासिका पर्यावरणप्रेमींसाठी मंगळवारपासून खुली झाली. ग्रीन रिव्होल्युशनच्या वतीने अनेक संस्थांच्या वतीने मंगळवारी महिंद्रा तसेच रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या सहकार्याने पर्यावरण संतुलनासाठी पहिल्या टप्प्यात तीन हजार रोपांची लागवड करण्यात आली. केंब्रिज शाळेच्या वतीने सायकल फेरी आणि प्रभात फेरी काढण्यात आली. सायकल फेरीचे उद्घाटन शाळेचे विश्वस्त भारती रामचंद्रन आणि राहुल रामचंद्रन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वस्तांनी विद्यार्थ्यांसह सायकल फेरीत सहभाग घेत मुलांचा उत्साह वाढविला. सायकल फेरी शाळेपासून पाथर्डी गावात नेण्यात आली. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी गावात पर्यावरण दिनानिमित्त पथनाटय़ सादर करत पर्यावरणाचा जागर केला. फेरीचा समारोप शाळेत वृक्षारोपणाने झाला. मुख्याध्यापिका विजया पाटील-राहणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. मेरी शाळेत संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका आशा डावरे यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आणि वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. दिवसेंदिवस होणारी वृक्षतोड थांबविणे आणि त्यामुळे होणारी धूप थांबवणे गरजेचे आहे. शाळा परिसरात रहाळकर, शिक्षक मंडळ उपाध्यक्ष दिलीप अहिरे आदींच्या उपस्थितीत विविध रोपे लावण्यात आली नेहरू युवा केंद्र संलग्न शक्ती विकास अकॅडमीच्या वतीने अनंत कान्हेरे मैदान परिसरात संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अक्षय गांगुर्डे, चंद्रकांत चव्हाण यांनीही वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. देवळा महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने लोकसंग्रह पर्यावरण समिती माळवाडी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सी. बी. दाणी यांनी वृक्षावर प्रेम करा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका, असा सल्ला दिला.यावेळी मयूर ठाकूरने सूत्रसंचालन केले. सुजित आहेरने आभार मानले.