नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास

नवी मुंबईत शनिवारी सकाळपासून धुरकट असे वातावरण दिसून येत असून, शहरामधील प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीचा हा परिणाम असल्याचे समोर आले आहे. शनिवारी नवी मुंबईतील प्रदूषण हे दिल्लीपेक्षादेखील अधिक असल्याचे सफर इंडिया एअर क्वालिटी सव्‍‌र्हिस संस्थेच्या सव्‍‌र्हेमध्ये दिसून येत होते. प्रदूषणात अचानक झालेल्या वाढीमुळे नवी मुंबईकरांना सकाळच्या वातावरणातदेखील श्वास घेताना त्रास सहन करावा लागत होता.

तीन-चार दिवसांपूर्वी नवी मुंबईत ओखी पावसाच्या वादाळामुळे नवी मुंबईतील वायुप्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट झाली असल्याची माहिती समोर आली होती. सफर इंडिया एअर क्वालिटी सव्‍‌र्हिस या केंद्र शासनाच्या संलग्न असलेल्या संस्थेने केलेले हवेतील मोजमापाच्या सव्‍‌र्हेनुसार ही माहिती आली होती. मात्र ओखी पावसाचे वादळ थांबल्यांनतर नवी मुंबईतील वायुप्रदूषणात अचानक वाढ झाली आहे. शनिवारी नवी मुंबईच्या वातावरणाने तर दिल्लीलादेखील मागे टाकले असल्याचे सफर इंडिया एअर क्वालिटी सव्‍‌र्हिस संस्थेच्या मोजमापावरून दिसून येत होते.

नवी मुंबईची शनिवारी हवा गुणवत्ता पातळी ही ३४९ इतकी होती. मात्र दिल्लीची ३०६ इतकी होती. शनिवारी वातावरणात झालेल्या बदलामुळे नवी मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. हिवाळ्यामुळे मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना श्वास घेतानादेखील त्रास जाणवत होता. वातावरणात होत असलेल्या या बदलामुळे अशक्तापणा वाटत असल्याचे नागरिकांच्या तक्रारी होत्या. वातावरणामध्ये असा अचानक का बदल झाला याची माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण निंयत्रण मंडळाचे अधिकारी उमेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

धुरक्यामुळे सकाळची शाळा उशिराने सुरू

मुंबई आणि परिसरात सकाळी पसरलेल्या धुरक्यामुळे सकाळच्या अधिवेशनातील शाळा बस सुमारे अर्धा तास उशिराने सुरू झाल्या. यामुळे शनिवारी शाळेच्या सकाळच्या सत्राला उशिरा सुरुवात झाली आहे.  -अनिल गर्ग, शाळा बसमालक संघटना