मत्स्यदुष्काळ आणि पावसाळ्याच्या तोंडावर खरेदी वाढल्याचा परिणाम उरण : पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर वाढलेली मागणी आणि मत्स्यदुष्काळामुळे घटलेला पुरवठा, यामुळे सध्या सुक्या मासळीच्या दरांत किलोमागे सुमारे १०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याची बेगमी म्हणून सुक्या मासळीचा साठा करून ठेवणाऱ्यांना खरेदीत हात आखडता घ्यावा लागत आहे. पावसाळ्यात मासेमारी बंदी लागू होत असल्यामुळे ताजे मासे मिळेनासे होतात, त्यांच्या किमतीही वधारतात. त्यामुळे या चार महिन्यांकरिता किनारपट्टीवरील रहिवासी सुक्या मासळीचा साठा करून ठेवतात. त्यासाठी मेअखेपर्यंत या मासळीची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र मासळीचा दुष्काळ, शहरीकरणाने गिळंकृत केलेल्या मासे सुकवण्याच्या जागा यामुळे सुक्या मासळीची उपलब्धता घटली आहे. दर मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना पावसाळ्यापूर्वीच्या सुक्या मासळीच्या खरेदीला आवर घालावा लागत आहे. महागलेल्या मासळीमुळे अनेकांनी आपला हात आखडता घेतला आहे. पावसाळ्याच्या दोन महिन्यांत मासळीच्या प्रजननसाठी खोल समुद्रातील मासेमारीवर राज्य व केंद्र सरकारकडून बंदी घातली जाते. त्यामुळे या काळात मासळी मिळत नाही. पर्याय म्हणून खवय्ये पावसाळ्यात सुक्या मासळीचा आस्वाद घेतात. जादा मासळी मीठ लावून कडक उन्हात सुकवली जाते. सुक्या मासळीचा बाजार पावसाळा जवळ आला की तेजीत येतो. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रातील मिळणाऱ्या मासळीचेच प्रमाण कमी झाल्याने सुकी मासळीही कमी झाली आहे, अशी माहिती मासळी विक्रेत्या शकू पाटील यांनी दिली. सुकटीचे वेगवेगळे प्रकार किलोमागे सुमारे १०० रुपयांनी महागले आहेत. वाकटय़ा, शिंगाला, माकोल, बोंबीलचे दरही वाढले आहेत. या सर्व माशांचा आकारही पूर्वीच्या तुलनेत लहान झाला आहे. पूर्वीप्रमाणे मोठय़ा आकाराची मासळी आता मिळेनाशीच झाली आहे. सुकी मासळी महागल्यामुळे मागणीही घटली आहे. - नंदिीनी कोळी, मासळी विक्रेत्या दरवाढ (रुपय/किलो) प्रकार पूर्वी सध्या जाडी सुकट ३५० ४५० लहान सुकट २५० ३५० टेंगळी सुकट ४०० ५०० कोळंबी सोडे १२०० १५००