उरण : मुंबईतील घाटकोपरच्या फलक अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर शासनाने आदेश देताच सिडकोने उरण-पनवेलमधील २५ पेक्षा अधिक बेकायदा फलक हटविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र यातील फलक हे साहित्याचे कोणतेही नुकसान न होता सुरक्षितपणे हटविण्यात येत असल्याने अशा प्रकारची सवलत या बेकायदा फलकांना का दिली जात आहे, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

मुंबईतील १६ जणांचा जीव घेणाऱ्या या दुर्दैवी घटनेनंतर उरण परिसरातील ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या बेकायदा फलकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उरण परिसरातील गव्हाण फाटा ते उरण, जेएनपीएच्या तसेच सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील विविध मार्गांच्या कडेला जागोजागी फलक उभारण्यात आले आहेत. राजकीय, जागा-जमिनी, रियल इस्टेट, नवनवीन इमारती, ज्वेलर्स आणि इतर विविध प्रकारातील जाहिरातींचे अगदी मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी उभारले आहेत. जाहिरातींद्वारे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी उभारण्यात आलेले उरण परिसरातील गर्दीच्या ठिकाणी धोकादायक स्थितीत हे फलक उभे आहेत. सिडकोने उरणमधील नवीन शेवा सर्कल, बोकडवीरा-फुंडे, जेएनपीटी कामगार वसाहत यादरम्यानच्या रस्त्यावरील तसेच पनवेल सिडको हद्दीतील सुमारे २५ बेकायदा फलक उतरविले आहेत.

आणख वाचा-फ्लेमिंगो अधिवासात मद्य मेजवान्या? बीट मार्शलची गस्त व्यवस्था कधी?

सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात असताना ते बांधकाम किंवा ढाचा पूर्णपणे नष्ट केला जातो. मात्र हे फलक सुरक्षितपणे का उतरविले जात आहेत? अशा प्रकारची सवलत भूमिपुत्रांना का दिली जात नाही, असा सवाल विवेक म्हात्रे यांनी केला आहे. शासनाच्या आदेशानुसार सिडको हद्दीतील बेकायदा फलक हटविण्याची कारवाई सुरू आहे. यामध्ये काही फलक सिडकोचे आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. बेकायदा फलकांबाबत नोटिसा बजावण्यात येत असल्याची माहिती सिडको जनसंपर्क अधिकारी प्रियांका रातांबे यांनी दिली आहे.