नवी मुंबई : नवी मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या मागील आठवडाभरापासून वाढत असल्याचे चित्र आहे. शहरातील करोना स्थिती सध्या अत्यंत नियंत्रणात असली तरी मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असून वाढत्या रुग्णसंख्येबाबत पालिका लक्ष ठेवून आहे.नवी मुंबई शहरातच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातच मागील काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्ण वाढत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. मागील तीन दिवसांपासून दिवसाला २० व त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पालिकेने रुग्णसंख्या वाढताच तात्काळ खाटांची सुविधा करण्याची व्यवस्थाही केली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.सध्या शहरातील एकमेव करोना उपचार केंद्र असलेले वाशी प्रदर्शनी केंद्रही बंद असले तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेने नुकतीच या केंद्राची पाहणी केली असून करोनाची रुग्णसंख्या वाढल्यास तात्काळ खाटांची सुविधा उपलब्ध करता येणार आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास तात्काळ सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मागील दोन महिन्यांपासून शहरात करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. शहरात आतापर्यंत जवळजवळ ३४,७६,६४१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. एमएमआर क्षेत्रात व ठाणे जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा करोनाचे संकट घोंघावत आहे की काय अशी चिंता वाटू लागली आहे. शहरात संपूर्ण निर्बंध हटवल्यानंतर शहरात सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. शहरात करोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या अनेक दिवसांपासून एक अंकी येत होती. पालिकेने चाचण्यांची संख्याही काही प्रमाणात कमी केली आहे. शहरात दीड लाखांपेक्षा अधिक जण आतापर्यंत करोनाग्रस्त झाले आहेत.नवी मुंबईत करोनाची रुग्णसंख्या अत्यंत नियंत्रणात असून मागील काही दिवसांपासून नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. दैनंदिन करोना रुग्णसंख्या पुन्हा २० पर्यंत आली आहे. - संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिकाशून्य मृत्यूजिल्हयाच्या करोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत असल्याचे दिसून येत असले तरीही सुमारे एक महिन्याच्या कालावधीत करोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात एकूण ४५७ करोना बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक २६२ रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. १३४ रुग्णांना करोनाची सौम्य लक्षणे असून ते घरीच उपचार घेत आहेत.