अरबी समुद्रातून उरणमार्गे मुंबई, अलिबाग, रेवस ते करंजा या मार्गाने सुरू असलेली जलसेवा वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला टाळून प्रवास करणाऱ्यांसाठी सोयीस्कर मार्ग तर आहेच. पण सध्या या प्रवासादरम्यान विविध पक्ष्यांबरोबरच सीगल पक्ष्यांचादेखील वावर असल्याने अनेकांना हा प्रवास हवाहवासा वाटत आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांकडील खाद्यपदार्थ खाण्यासाठी हे पक्षी बोटीच्या वेगाने सोबत करत असल्यामुळे लहान मुलांबरोबरच इतरांचीही करमणूक यामुळे होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मुंबई ते उरण (मोरा) अलिबाग (मांडवा) आणि रेवस ही अलिबाग-उरणला जोडणारी जलसेवा सुरू आहे. यातील मुंबई-उरण आणि रेवस-करंजा ही सेवा बारमाही सुरू असते. वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे रस्त्यांवरून प्रवास करणे हे जिकिरीचे तर बनलेलेच आहे. परंतु, या रस्त्यांवरील खड्डे, त्यातील धूळ आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण यामुळेदेखील राज्य आणि केंद्र सरकारकडून जलप्रवासाला अधिक महत्त्व दिले जात आहे. यासाठीचे मुंबई-मोरा मार्गावर जलद गतीने प्रवासासाठी स्पीड बोटींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळे हे अंतर केवळ ४० मिनिटांत पार करता येणे सहज शक्य झाले आहे. मी दररोज उरण ते अलिबाग असा जलमार्गे प्रवास करतो. १५ मिनिटांच्या या प्रवासात प्रवाशांकडील खाद्यपदार्थ खाण्यासाठी सीगल पक्ष्यांचाही वावर या प्रवासी बोटींवर असतो. विशेष म्हणजे, ज्या वेगाने बोट धावत असते त्याच वेगाने हे पक्षीदेखील प्रवास करत असल्याने प्रवासादरम्यान प्रवाशांची करमणूकदेखील होते. - समाधान भोईर, प्रवासी, रेवस-करंजा.