डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

लहानपणी केलेल्या हिरिरीच्या भांडणांना आता काहीही अर्थ नाही हे लक्षात आलं, की त्यातल्या फोलपणाचं हसू येतं. आश्चर्य वाटतं की, एका बाकावर पट्टीने सीमारेषा आखली होती, कोणी तरी चुगली केली म्हणून प्रिय असलेलं मत्र तेव्हा मात्र तुटायला आलं होतं.. एरवी भावंडांशी कितीही तुझंमाझं असलं तरी त्यांच्या समर्थनार्थ परक्या व्यक्तीशी जोरदार भांडणं केली होती.. रस्त्यावरच्या कोणा तरी अनोळखी माणसाशी काही विशेष कारण नसताना जोराची वादावादी झाली होती..

प्रत्येकाच्या आयुष्यात मतभेदांचे अनेक प्रसंग येतात. काहींच्या आयुष्यात ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असतो, तर काही जण ‘मतभेदांच्या कडेकडेने’ चाललेले असतात. स्वत:ला मतभेदांपासून दूर ठेवत असतात.

आपले इतरांशी झालेले कोणतेही दोन मतभेद किंवा भांडणं आठवून बघू या. काय कारणं होती? यातलं काय खरं होतं? काय खोटं होतं? ते मान्य करू या. खरोखर प्रामाणिकपणे आणि अतिशय अलिप्तपणे विचार केला, तर लक्षात येईल की, त्या मतभेदांच्या पाठीमागे किती प्रकारच्या शक्यता होत्या. एकच एक कारण नव्हतंच. अनेक शक्यता. अनेक धारणा. अनेक भूतकाळ आणि अनेक वर्तमानकाळसुद्धा गोवलेले होते.

एकदा हे लक्षात आलं, की स्वत:च्या आणि इतरांच्या मतभेदांकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाते. असा प्रत्येक प्रसंग हा अनेक दृष्टिकोन आणि अनेक वास्तवांचं मिश्रण असतं आणि प्रत्येकाचं वास्तव हे एकमेकांपेक्षा वेगळं असू शकतं. कोणतीही बाजू फक्त काळी किंवा फक्त पांढरी नसते, तर राखाडीही असते आणि राखाडी रंगाच्याही अनेक छटा असतात. जास्त काळं – कमी पांढरं किंवा जास्त पांढरं – कमी काळं, हे स्वीकारणं यातच शहाणपण.

जेव्हा दोन बाजूंमध्ये कोणत्याही कारणावरून मतभेद होतात तेव्हा त्या दोन्ही बाजूंची एक चूक होते ती म्हणजे विशिष्ट गोष्टीवर विश्वास ठेवणं आणि तीच गोष्ट अंतिम सत्य म्हणून मानली जाणं. म्हणूनच आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा चच्रेला तयार होणं हे योग्य. सहमती सोपी असते. त्यापेक्षा मतभेदांसाठी मेंदूला जास्त शक्ती खर्च करावी लागते. कितीही रागासारख्या भावना निर्माण झाल्या आणि त्यामुळे ताणकारक रसायनं स्रवली तरी त्या रसायनांचा भडका होऊ न होता त्यांना हाताळणं हेच कौशल्य.