व्यवहारात संख्या दशमान पद्धतीने (म्हणजे १० अंक पाया धरून) वापरल्या जातात. त्यात ० ते ९ या अंकांचा वापर होतो. तसेच संख्येमधील अंकाच्या स्थानावरून त्यांची किंमत ठरते. उदा. २०१७ ही संख्या घेतल्यास ती संख्या अशी लिहिता येईल. २०१७ = २ x १०३ + ० x १०२ + १ x १०१ + ७ x १०० संगणकीय क्षेत्रात द्विमान अंकपद्धती, म्हणजे २ अंक पाया धरून संख्या वापरल्या जातात. त्यामुळे त्यात ० ते १ हे दोनच अंक वापरता येतात. या अंकांना Binary digit = BIT म्हणतात. भौतिक क्षेत्रातील बऱ्या वस्तुंना केवळ दोन अवस्था असतात. उदा. स्वीच चालू (१) किंवा बंद (०). एखादे विधान सत्य/ असत्य. त्यामुळे वस्तूची अवस्था BIT ने दर्शविता येते. दशमान पद्धतीप्रमाणे द्विमान पद्धतीतही बीटच्या स्थानावरून त्याची किंमत ठरते. वरील तक्त्यात दुसऱ्या ओळीत प्रत्येक स्थानाची किंमत दिली आहे. उदा. द्विमान अंक पद्धतीत ‘२०२’ ही दशमान संख्या ‘११००१०१०’ अशी लिहिली जाईल. (तक्ता पहा.) (१२८+६४+*०+०+८+०+२+०). जेथे १ आहे तेथील किंमत घ्यावी लागते. ० असेल तेथील किंमत शून्यच. या तक्त्यात ८ बीट म्हणजेच १ बाईट (Byte) घेतला आहे. यावरून लक्षात येईल की एका बाईटमध्ये ० ते २५५ पर्यंत संख्या मांडतायेतात. काही पद्धतीत डावीकडील बीट हा चिन्हासाटी राखून ठेवला जातो. तेथे ० असल्यास संख्या धन (+) व १ असल्यास ऋण (-) धरतात. मात्र त्यात संख्यांची मर्यादा -१२७ ते +१२७ असते. द्विमान अंक पद्धतीत बेरीज व वजाबाकी दशमान पद्धतीप्रमाणेच उजवीकडून डावीकडे करतात. द्विमान अंक पद्धतीत १ मध्ये १ मिळवल्यास १० हे द्विमान उत्तर मिळते. त्यामुळे डावीकडील अंकात १ हातचा मिळवावा लागतो. ० तू १ वजा करता डावीकडून हातचा घेतला जातो. दिलेल्या संख्येत प्रत्येक अंक एक घर डावीकडे सरकवले की मूळ संख्येची दुप्पट होते. त्याउलट एक घर उजवीकडे सरकवले असता मूळ संख्या निम्मी होते. काही संगणकात आठ किंवा सोळा हे अंक पाया असलेली पद्धती वापरली जाते. द्विमान पद्धती ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात भारतीय विद्वान पिंगला यांनी छंदशास्त्राचे बाबतीत वापरली होती. या पद्धतीला आधुनिक रूप गॉडफ्राइड विल्हेम या जर्मन शास्त्रज्ञाने १७०३ सालच्या प्रबंधाने दिले. - श्रीनिवास म. मुजुमदार मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org प्रतिभा राय यांच्या कादंबऱ्या ‘मी स्त्रीवादी नाही तर मानवतावादी लेखिका आहे,’ असं म्हणणाऱ्या प्रतिभा राय यांनी वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदा लिहिली ती ‘सकाळ हेला’ (सकाळ झाली) ही कविता. ती ‘मीना बाजार’ या पत्रिकेत छापून आली. हा लेखनप्रवास आजही सुरू आहे. २० कादंबऱ्या, २४ कथासंग्रह, १० प्रवासवर्णने, दोन कवितासंग्रह, बालसाहित्य, अनुवादित साहित्य व अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ओदिशातील विश्वविख्यात मंदिर कोणार्कच्या प्रथम दर्शनातच त्यांनी ‘शिलालेख’ ही कविता लिहिली आणि नंतर ‘शिलापद्म’ ही कादंबरी. बरखा, बसन्त, बैशाख ही त्यांची पहिली कादंबरी. यानंतर अरण्य (१९७७), निषिद्ध पृथ्वी (१९७८), परिचय (१९७९), पुण्यतोया अपरायिता (१९७९) या शिवाय आदिभूमी, उत्तरमार्ग, याज्ञसेनी, महामोह आणि २००४ मध्ये ‘मग्नमाटी’ ही त्यांची शेवटची कादंबरी प्रकाशित झाली. ओदिशातील बोंडा या आदिवासी जमातीच्या चालीरीती, कथा त्यांची भाषा या साऱ्या वेगळय़ा जगाचं संशोधन करून लिहिलेली कादंबरी आहे ‘आदिभूमी.’ गांधीवादी विचारांच्या प्रभावामुळे अनेक जण स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले, पण स्वातंत्र्यानंतर उपेक्षाच वाटय़ाला आलेल्या अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची कहाणी म्हणजे ‘उत्तरमार्ग’ ही कादंबरी. भ्रष्ट शहरी जीवन, खेडय़ातील जीवनही कसं प्रदूषित करतं व मग तिथल्या महत्त्वाकांक्षी स्त्रिया दुष्टचक्रात कशा अडकतात, याचे चित्रण त्यांच्या परिचय आणि पुण्यतोया (१९७९) या कादंबऱ्यांतून आले आहे. ही कादंबरी १९७७ मधील सत्यघटनेवर आधारित आहे. विवाहित स्त्रीवर झालेला बलात्कार, काहीही दोष नसताना तिची झालेली विटंबना, मानसिक दुरवस्था हा या कादंबरीचा विषय. उमा दादेगावकर यांनी ‘पुण्यतोया’चा मराठी अनुवाद केला आहे. ‘महामोह’ सती अहल्येच्या जीवनावर आधारित या कादंबरीचा मराठी अनुवाद राधा जोगळेकर यांनी केला आहे. ‘मग्नमाटी’ ही ओदिशात १९९९ मध्ये झालेल्या भयंकर चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या जीवनाचं चित्रण करणारी कादंबरी आहे. कृतिशील, सजग अशा या लेखिकेने विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामात मदतही केली. आधुनिक जीवनशैलीतील ताणतणाव, वातावरण त्या काळातील महत्त्वाचे प्रश्न- याचे बारकाईने, तपशीलवार केलेलं रेखाटन ही त्यांची लेखनवैशिष्टय़े आहेत. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com