आठ महिन्यांत झालेल्या ८५ अपघातांत ५१ मृत्यू तर ९२ जखमी

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर: राज्यातील पाच महामार्गापैकी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा अपघातांसाठी अतिधोक्यांचा महामार्ग ठरत आहे. या महामार्गावर विविध अपघातांमध्ये आच्छाड ते मेंढवण खिंड परिसरामध्ये नोंद असलेल्या ८५ अपघातांत सुमारे ५१ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर ९२ जण जखमी झाल्याची नोंद आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीतील या नोंदी आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गचा हा सुमारे पंचावन्न किमीचा भाग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. याच भागामध्ये अपघात प्रवण क्षेत्रही आहे. आच्छाड ते मेंढवण खिंड या परिसरामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या गेल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तसेच रस्त्यांवर नादुरुस्त वाहने हटवण्यात झालेली दिरंगाईही अपघातांना कारणीभूत आहे. महामार्ग ठेकेदारामार्फत महामार्गाच्या दिशादर्शक फलकासह, सेवा रस्ते, मानवी सेवा रस्ते, वाहने वळवण्याचे ठिकाणे, धोकादायक वळणे, हॉटेल ढाब्याकडे जाणारी अनधिकृत वळणे अशा ठिकाणी विविध उपाययोजना करणे आवश्यक असताना तसे न केल्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचे सांगितले जाते. या भागामध्ये सर्वाधिक अपघात अवजड वाहनांचा होत आहे. अवजड वाहने वाहिनीची (लेन) शिस्त पाळत नसल्यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे प्रवासी वाहने, खासगी प्रवासी वाहने यांनाही अपघाताला सामोरे जावे लागत आहे. ज्वलनशील पदार्थ, नैसर्गिक घरगुती गॅस वाहतूक करणारे मोठे टँकरही याच परिसरातून जात असतात. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही रक्षक प्रणालीची व्यवस्था महामार्गावर नाही. कित्येक वर्षांपासून येथे अग्निशमन यंत्रणाही नाही.

 स्थानिक पोलिसांना एखादे बंद पडलेले वाहन बाजूला करावयाचे असल्यास   खासगी ठिकाणाहून बचावकार्याची यंत्रसामग्री मागवावे लागते. याच बरोबरीने तातडीने  रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. परिणामी स्थानिक स्तरावरून रुग्णवाहिका उपलब्ध करावी लागते. या परिसरामध्ये अनेक वाहने तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त होत असताना ती महामार्गावरून हटविण्यासाठी बराच वेळ जात आहे.

पितृ अमावास्येला श्राद्ध आंदोलन

महामार्ग नियोजन देखभाल दुरुस्ती करणाऱ्या व वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा तसेच ठेकेदार यांच्यामार्फत अपघातावेळी प्राथमिक उपचार बचावकार्य जीवरक्षक प्रणाली आदी सेवा वेळेवर पुरवल्या जात नसल्याने त्या मृत्यूशय्येवर आहेत या यंत्रणा व ठेकेदार यांना ही बाब लक्षात आणून देण्यासाठी व लक्ष वेधण्यासाठी महामार्गावर मेंढवण खिंड परिसरात पितृ अमावास्याच्या दिवशी श्राद्ध आंदोलन विविध संघटनांमार्फत आयोजित केलेले आहे.

मेंढवन भागात ४२१ अपघात

गेल्या पाच वर्षांत मेंढवन ते आच्छाड रस्त्यावर मेंढवन भागात ४२१ अपघात झाले असून यामध्ये २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २८९ प्रवाशी जखमी झाले आहेत. तसेच चारोटी या ठिकाणीही ३०२ अपघातामध्ये  ३२ मृत्यू झाले तर २८५ चालक, प्रवाशी जखमी झाले आहेत. धानिवरी या ठिकाणीही १२० अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू तर ११० जण जखमी झाले आहेत. आंबोली-तलासरी परिसरातसुद्धा १६४ अपघातांमध्ये ३४ जणांचा मृत्यू व १२८ जण जखमी झाले आहेत.

जून ते ऑगस्ट

* अपघात नोंद        ३०

* मृत               १२

* जखमी              २९

जानेवारी ते ऑगस्ट

* अपघात नोंद               ८५

* मृत              ५१

* जखमी              ९२

महामार्गाचे नियोजन व नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेसह ठेकेदार यांच्या बेपर्वाईमुळे अनेक अपघातांमध्ये तातडीच्या उपाययोजना केल्या जात नाही या सेवा मृत्युशय्येवर आहेत सेवा मिळाव्यात म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्राद्ध आंदोलन केले जाणार आहे.

हरबंस नन्नाडेप्रतिनिधी, अखिल भारतीय वाहन चालकमालक संघटना, गुजरात महाराष्ट्र महामार्ग