लोकसत्ता वार्ताहर

डहाणू : पालघर समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका मासेमारी बोटीला गुजरात कडे जाणाऱ्या एका मालवाहू जहाजाने शनिवार ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.२० वाजताच्या सुमारास धडक देऊन अपघात केला आहे. अपघातात बोटीचे मोठे नुकसान झाले असून धडक देणाऱ्या जहाजाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. दरम्यान नौकेत अडकलेल्यांनी वायरलेस वरून इतर बोटींना संपर्क करून मदत घेत किनारा गाठला आहे.

धाकटी डहाणू येथील संतोष मर्दे यांच्या मालकीची “सागर सरिता” ही नौका घेऊन आठ खलाशी डहाणू बंदरात २० नौटीकल मैल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. दरम्यान ६ एप्रिल रोजी एका अज्ञात मालवाहू जहाजाने या नौकेला धडक देऊन अपघात केला आहे. अपघाताच्या धक्क्याने बोटीमधील दोन खलाशी समुद्रात पडले असून त्यांना वाचवण्यात इतर खलाश्यांना यश आले आहे. जहाजाच्या धक्क्याने नौकेच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले असून नौकेमध्ये पाणी शिरले होते. खलाशांनी वायरलेस वरून जवळच मासेमारी करणाऱ्या “हिमसाई” नौके वरील खलाशांना संपर्क करून मदत मागितली. दरम्यान रात्री १ वाजताच्या सुमारास हिमासाई बोटीवरील खलाशांनी अपघात ग्रस्त नौकेस बांधून डहाणू खाडी पर्यंत सोडले आहे.

आणखी वाचा-पालघर : निवडणूक प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची तारांबळ, मुल्यांकन चाचणी व निवडणूक प्रशिक्षण एकाच वेळेत

अपघात ग्रस्त नौकेला भारतीय कोस्ट गार्ड विभागाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्यामुळे मच्छिमारांमध्ये असंतोषाचे वातावरण असून अपघात जन्य परिस्थितीत शासकीय यंत्रणेची मदत मिळत नसल्यामुळे भारतीय कोस्टगार्ड यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघात ग्रस्त नौकेचे मालक संतोष मर्दे यांनी याविषयी वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात जहाजावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाणगाव पोलिसांकडून हा गुन्हा कोलाबा येथील येल्लो गेट पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.