कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप पालघर : वाडा तालुक्यातील जलयुक्त शिवार व राष्ट्रीय पेयजल योजनाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सुमारे १८ विहिरींचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रमुख व अध्यक्षा याही मूळच्या वाडा भागातल्या आहेत व त्या स्वत: पाणीपुरवठा समितीच्या सभापती आहेत. मात्र नागरिकांच्या पाणी समस्याकडे त्यांनीही जातीने लक्ष दिले नसल्याचे आरोप केले जात आहेत. तालुक्यातील वरसाळे ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा, कडूपाडा जांभूळपाडा, तोरणे (धिंडेपाडा), पोशेरी, कांबारे (डोंगरी पाडा) , शेले, शेलटे, वाघोटे, असनस, कलंभई, विलकोस, शिंदेपाडा, दाढरे, मोज व चेंदवली अशा तब्बल अठरा गावातील विहिरी जलयुक्त शिवार व राष्ट्रीय पेय जल योजनेतून मंजूर आहेत. ठेकेदारांनी किरकोळ कामे करून यातील जवळपास सर्वच विहिरीचे कामे अपूर्ण ठेवल्याने यात मोठा गैरव्यवहार व अपहार झाल्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात येणाऱ्या या विहिरी अपूर्ण असल्यामुळे त्यातून पाणी घेणे जिकिरीचे बनले आहे. सद्यस्थितीत लघु पाणीपुरवठा योजनेचे आधारे पाणीपुरवठा सुरू असून त्यामध्येही अनेक वेळा खंड पडत आहे. ठेकेदारावर कारवाई सुरू असल्याने विहिरीचे काम अपूर्णावस्थेत आहेत. सध्या गावांवर प्रशासक नेमल्याने कामांना गती येत नाही त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत, असे वासराळे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामध्ये जातीने लक्ष घालून पुढील कार्यवाही करण्याचा सूचना अधिकारी वर्गाला दिल्या जातील व आढावा घेऊन नागरिकांच्या पाणी समस्या गांभीर्याने सोडवू, अशी ग्वाही देते. -वैदेही वाढाण, अध्यक्ष, जि.प.पालघर नागरिकांची पाणी समस्या दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करून तो सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. -रोहिणी शेलार, जि. प सदस्य विहिरी अपूर्ण असल्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून जिल्हास्तरावर पाठवण्यात आला आहे. तेथूनच माहिती घेतल्यास उचित ठरेल. -सुरेश पवार, उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग