आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाने १८ जागांवर दावा केला असला तरी भाजप एवढ्या जागांची मागणी मान्य करणे कठीण असल्याचे भाजपच्या एकूणच भूमिकेवरून स्पष्ट होते. शिंदे गटाकडे सध्या १३ खासदार असले तरी तेवढ्या जागाही सोडण्याची भाजपची तयारी नसल्यानेच शिंदे गटाने दबावतंत्र सुरू केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदारांच्या बैठकीत लोकसभेच्या १८ जागा मिळाल्याच पाहिजेत, असा दावा करण्यात आला. गेल्या वेळी भाजपबरोबरील युतीत १८ जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. यापैकी १३ खासदार हे शिंदे गटाबरोबर तर पाच खासदार हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. गेल्याच आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह देवेद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे गटाचे खासदार असलेल्या १३ जागा सोडण्यासही भाजपची तयारी नसल्याचे समोर आले. यामुळेच शिंदे गटाने १८ जागा मिळाल्याच पाहिजेत, असे दबावतंत्र सुरू केले आहे.

हेही वाचा : बीडमध्ये पंकजा मुंडे उमेदवार ? 

उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. भाजप आणि कमळ चिन्हावर उमेदवार रिंगणात असल्यास त्याचा अधिक प्रभाव पडेल, असे भाजप नेत्यांचे गणित आहे. यामुळे भाजपला ३० पेक्षा अधिक जागा लढायच्या आहेत. शिंदे गट आणि अजित पवार या दोन्ही गटांना १५ ते १८ जागा सोडण्याची भाजपची योजना आहे. लोकसभेला आम्हाला अधिकचा वाटा मिळावा, विधानसभेला दोन्ही गटांना जास्त जागा सोडू, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. पण भाजपच्या आश्वासनावर शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते सावध भूमिका घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला ३५० पेक्षा अधिक जागा मिळाल्यास राज्यातील विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांची फारशी दखल घेतली जाणार नाही, अशी भीती शिंदे गटाच्या नेत्यांना आहे. तशी चर्चाही शिंदे गटाच्या खासदारांच्या बैठकीत झाल्याचे समजते.

हेही वाचा : श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात मनसेचे समर्थन कुणाला ? राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला

शिंदे गटाने १८ जागांची मागणी केली असली तरी सध्या खासदार असलेले सर्व १३ मतदारसंघ मिळावेत, अशी शिंदे गटाची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही खरी शिवसेना आहे हे चित्र सध्या उभे करण्यात आले आहे. यासाठी भाजपला मित्र पक्ष शिंदे गटाला अधिकचे झुकते माप द्यावे लागेल. कारण १८ पेक्षा कमी जागा वाट्याला आल्या तरी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे सत्तेसाठी भाजपला शरण गेल्याची टीका करण्याची संधी सोडणार नाहीत. नेमकी हीच भीती शिंदे गटाच्या खासदारांना आहे. भाजप वापरून घेते असा प्रचार ठाकरे गटाने केला तरी त्याचा मतदारांवर परिणाम होऊ शकतो. यामुळेच १८ जागा मिळाव्यात, अशी शिंदे गटाची भूमिका आहे. शिंदे गटाला १८ आणि अजित पवार गटाला पाच ते सहा जागा सोडाव्या लागल्यास भाजपच्या वाट्याला जेमतेम २५ जागा येऊ शकतात. भाजप एवढ्या कमी जागा स्वत:कडे ठेवण्याची शक्यता कमीच आहे.