आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सोमवारी (११ मार्च) लखनौ येथील सपा मुख्यालयात इंडिया आघाडीतील समाजवादी पार्टी (सपा) आणि काँग्रेसची पहिली समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आणि प्रचार योजनांवर चर्चा करण्यात आली.

दोन्ही पक्षांची एकत्रित बैठक पहिल्यांदाच घेण्यात आली. या बैठकीस सपा अध्यक्ष अखिलेश यादव, पक्षातील वरिष्ठ सहकारी आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील ८० पैकी १७ लोकसभा जागा सपाने काँग्रेसला दिल्या आहेत. या लोकसभा जागांसह अन्य विषयांवर सपाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि आराधना मिश्रा यांच्याशी चर्चा केली. उर्वरित ६३ जागांसाठी दोन्ही मित्रपक्षांच्या नेत्यांची अशीच एक बैठक पुन्हा होईल, या जागांवरून सपा आणि इतर मित्र पक्ष लढतील, असे सूत्रांनी सांगितले.

Sangli Lok Sabha, Sangli,
सांगलीत काँग्रेस आमदारांची झाली पंचाईत
Congress, Vanchit, Muslims, Akola,
अकोल्यात मुस्लिमांच्या मतांवर काँग्रेस व वंचितचा डोळा
Akola Lok Sabha, Prakash Ambedkar, BJP,
प्रकाश आंबेडकर, भाजप, काँग्रेसमधील तिरंगी लढतीचा फायदा कोणाला ?
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…

समन्वय बैठकीतील निर्णय

सोमवारच्या बैठकीत, सपा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्तम समन्वय असावा यासाठी राज्य आणि मतदारसंघ स्तरावर नेत्यांसाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. समन्वय समित्यांमध्ये युतीतील उमेदवारांच्या प्रचारादरम्यान उद्भवणारे मतभेददेखील दूर केले जातील.

सूत्रांनी सांगितले की, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत, सपा आणि काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव होता; ज्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यातून दोन्ही पक्षातील नेत्यांनी धडा घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी युतीला यश मिळावे, यासाठी अनेक संयुक्त सभा घेतल्या होत्या. मात्र तरीदेखील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक जागांवर मतभेद होते; ज्यामुळे त्यांचा पराभव झाला. तेव्हा किमान १४ मतदारसंघात दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले होते. युतीतील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविल्याने भाजपाच्या उमेदवारांना याचा फायदा झाला होता.

दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, यावेळी त्यांना २०१७ मध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती नको आहे. दोन्ही पक्ष भाजपाचा पराभव करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. “आम्ही पाहिलं की, २०१७ मध्ये अनेक जागांवर आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो आणि एकमेकांची मते कमी केली; ज्याचा थेट फायदा भाजपाला झाला. यावेळी, काँग्रेस आणि सपा या दोघांनाही त्याच चुका पुन्हा करायच्या नाहीत,” असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान अखिलेश यांनी नेत्यांना सांगितले की, दोन्ही पक्षांनी सर्व जागांवर एकमेकांना पाठिंबा द्यावा. सपा-काँग्रेस युती तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पातळीवर जाईल याची खात्री करावी.

२०१९ च्या निवडणुकीतील ‘त्या’ पाच जागा

२०१९ च्या निवडणुकीत, तुलसीपूर जागेवर भाजपाचे कैलाशनाथ शुक्ला ६२,२०० मतांनी विजयी झाले होते. काँग्रेसच्या झेबा रिझवान यांना ४३,६०२ मते मिळाली होती, तर सपाचे अब्दुल मशोद खान यांना ३६,४१३ मते मिळाली होती. दोन्ही मित्रपक्षांचे एकत्रित मते कैलाशनाथ यांना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त होते.

अमेठी विधानसभेच्या जागेवरही असेच चित्र दिसले. भाजपाच्या गरिमा सिंह यांना ६३,९१२ मते मिळाल्याने त्यांनी ही जागा जिंकली. सपा उमेदवार आणि माजी मंत्री गायत्री प्रसाद यांना ५८,९४० मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार अमिता सिंह यांना २०,००० मते मिळाली होती. अशा प्रकारे, सपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांना एकत्रितपणे भाजपाच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली.

रायबरेलीमधील उंचाहार आणि अमेठीतील गौरीगंज सारख्या जागांवर, सपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होती; जिथे सपाचे मनोज पांडे आणि राकेश प्रताप सिंह विजयी झाले. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत, मनोज पांडे आणि राकेश प्रताप सिंह यांनी भाजपाच्या उमेदवारांच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले होते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, सपाने मायावतींच्या नेतृत्वाखालील बसपबरोबर युती केली होती. या निवडणुकीत सपाने ३७ जागा लढवल्या होत्या, परंतु केवळ ५ जागा त्यांना जिंकता आल्या. बसपने ३८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आणि १० जागा जिंकल्या. एकट्याने गेलेल्या काँग्रेसला केवळ रायबरेली जागा जिंकता आली होती.

२०१७ च्या निवडणुकीत कोणाला किती मतं?

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सपाने राज्यातील ४०३ जागांपैकी ३११ जागांवर आणि काँग्रेसने ११४ जागांवर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसला ६.२५ टक्के मतांसह ७ जागा जिंकता आल्या. सपाने २१.८२ टक्के मतांसह ४७ जागा जिंकल्या, तर भाजपाने ३९.६७ टक्के मतांसह ३१२ जागा जिंकत विजय मिळवला.

हेही वाचा : CAAच्या माध्यमातून मतुआ समाजाची मतं वळवण्याचे भाजपाचे डावपेच

२०१७ मधील युतीचा पराभव पाहता, सपा आणि काँग्रेस नेत्यांचा दावा आहे की, ते यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. “दोन्ही पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना एकमेकांना पाठिंबा देण्यास पटवून देऊ शकत नसतील तर युतीला काही अर्थ नाही. अशाने आपण भाजपाला मदत करू, ”असे एका ज्येष्ठ सपा नेत्याने सांगितले.