उत्तराखंडमधील हल्दवानीमध्ये हिंसाचाराची कमी झाल्यानंतर आता पोलीस हिंसाचार करणाऱ्यांना अटक करण्यात व्यस्त आहेत. हल्दवानी येथील वनभुलपुरा येथे दगडफेक, जाळपोळ आणि पेट्रोल बॉम्बद्वारे हिंसाचार पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाच्या एका नेत्याचा भाऊ, दोन नगरसेवक, एक खाण व्यावसायिक आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. सध्या पोलिसांना अब्दुल मलिकवर सर्वाधिक संशय असून, तो फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक आरोपींकडे पोलीस चौकशी करत असून, इतर लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय ५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. खरं तर हल्दवानी हिंसाचाराचा अब्दुल मलिक यांना मास्टरमाइंड समजले जात आहे. ज्या मशीद अन् मदरशात विध्वंस झाला त्या मलिक चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. नैनितालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रल्हाद नारायण मीणा यांनी यापूर्वी सांगितले होते की, मलिक याने बेकायदेशीर बांधकाम केले होते आणि त्याने हिंसाचाराचे नेतृत्वही केले होते. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना उच्च न्यायालयाचे वकील अहरार बेग म्हणाले की, त्यांनी याचिका दाखल केली होती. “गेल्या वर्षी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वनभुलपुरा भागातील रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या कुटुंबांना बेदखल करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यावेळी मलिक याने त्या कुटुंबांना मोफत कायदेशीर मदत दिली होती. यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात सार्वजनिक सहानुभूती मिळाली होती.” उत्तराखंडमधील हल्दवानीमधील रेल्वेच्या २९ एकर जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्याच्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. ‘मानवतावादी प्रश्न’ असा हा मुद्दा असल्याचे सांगून न्यायालयाने ५० हजार नागरिकांना एका रात्रीत हटविता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. वादग्रस्त भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी अतिक्रमणे हटविण्याच्या आदेशाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे जमिनीचा मालकीहक्क आहे. न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘‘याबाबत एक व्यावहारिक उपाय शोधणे आवश्यक आहे.’’ रेल्वेच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जमिनीवर चार हजार ३६५ कुटुंबांनी अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी ५० हजार नागरिक वास्तव्य करीत आहेत. यामधील बहुसंख्य मुस्लीम आहेत. यातही अब्दुल मलिकने इथल्या कुटुंबांना कायदेशीर मदत दिली होती. तसेच त्यांना न्यायालयात अपील करण्यासही सहकार्य केले होते. माजी पत्रकार असलेले इस्लाम हुसैन म्हणाले की, मलिक अनेकदा इथे सरकारी प्रकल्पांसह खासगी कंत्राटदार म्हणून काम करायचा. मलिकचे कुटुंब पहिले भटके होते आणि ते घोड्यांचा व्यवसाय करायचे, इंग्रजांच्या काळात त्यांनी लाकडाचा व्यवसायही केला. त्यात त्यांना मोठं यश मिळालं. हल्दवानीमध्ये त्यांची मोठी अब्दुल्ला इमारत होती. पण ती आता उद्ध्वस्त झाली आहे. हल्दवानीमधील वनभुलपुरा भागातील रेल्वेच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्याचे उच्च न्यायालयाने २० डिसेंबर रोजी आदेश दिले होते. यामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना एक आठवड्याची नोटीस देण्यात यावी. त्यानंतर त्यांना या जागेवरून हटविण्यात यावे, असे नमूद केले होते. त्या विरोधात काही रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्यानंतरच निदर्शने संपुष्टात आली. नैनिताल उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका रिट याचिकेत मलिकची पत्नी साफिया आणि इतरांनी हायकोर्टात याचिका दाखल करून महापालिकेच्या नोटिशीला आव्हान देत ती रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेत म्हटले होते की, त्यांच्याकडे १९३७ पासूनची जमिनीची लीज आहे, जे त्यांना मलिक कुटुंबाकडून मिळाले आहे. खरं तर उत्तराखंडच्या हलद्वानी जिल्ह्यात गुरुवारी (८ फेब्रुवारी) प्रशासनातर्फे नझूल जमिनीवर असणारी अवैध बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत अवैधरीत्या बांधण्यात आलेली मशीद आणि मदरसे पाडल्यानंतर हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. नझूल जमीन ही सरकारच्या मालकीची असते. साधारणपणे अशी जमीन कोणत्याही घटकाला एका ठरावीक कालावधीसाठी राज्यातर्फे भाडेतत्त्वावर देण्यात येते. साधारणपणे हा कालावधी १५ ते ९९ वर्षांचा असतो. भाडेपट्ट्याची मुदत संपत असल्यास याचे नूतनीकरण करण्यासाठी स्थानिक विकास प्राधिकरणाच्या महसूल विभागाकडे लेखी अर्ज सादर करता येतो. त्यात सरकार या जमिनीचे नूतनीकरण करू शकते किंवा हा करार कायमस्वरूपी रद्द करून, ती जमीन परतही घेऊ शकते. भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये विविध संस्थांना विविध उद्देशांसाठी नझूल जमीन देण्यात आली आहे. यासीनने ही जमीन अख्तारी बेगम आणि नबी रझा खान यांना विकली होती, ज्यांनी नंतर त्यांच्या हयातीत हिबाद्वारे साफियाचे वडील अब्दुल हनीफ खान यांना भेट दिली. अख्तारी बेगम यांचा मुलगा गौस रझा खान याने या वर्षी ३१ जानेवारी रोजी प्रतिज्ञापत्रात ही मालमत्ता हस्तांतरण आणि गिफ्ट म्हणून मिळाल्याचं कबूल केलं होतं. २००७ मध्ये अख्तारी बेगम आणि नबी रझा खान यांनी उच्च न्यायालयाकडून राज्य आणि नैनिताल जिल्हा दंडाधिकारी यांना फ्रीहोल्ड अधिकार प्रदान करण्यासाठी योग्य आदेश जारी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याच वर्षी ऑगस्टमध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश देत याचिका निकाली काढली. दरम्यान, सफियाचे वडील अब्दुल यांचे २०१३ मध्ये निधन झाले होते आणि तिला उत्तराधिकारी संपत्तीचा वारसा मिळाला होता. २००७ च्या न्यायालयाच्या आदेशानंतर याचिकाकर्त्यांनी मालमत्तेचा मुक्त होल्ड करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना नाझूल विभागाकडून अडथळे आले, परिणामी प्रकरण पुढे गेले नाही. साफियाने न्यायालयाला माहिती दिली की, २०२० मध्ये तिच्या पतीला नोटीस बजावण्यात आली होती, ज्याने त्याला तातडीने उत्तर दिले. मात्र, त्याच्या प्रतिसादाला न जुमानता त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी जागेवरील मदरशाच्या काही वर्गखोल्या पाडण्यात आल्या. त्यानंतर तिने मालमत्तेची पार्श्वभूमी तपशीलवार एक निवेदन सादर केले आणि खोल्या दुरुस्त करण्यासाठी परवानगीची विनंती केली. यंदा २७ जानेवारी रोजी नगर निगमच्या अधिकाऱ्यांनी पूर्वसूचना किंवा सुनावणीची संधी न देता जबरदस्तीने ताब्यात घेण्याच्या प्रयत्नाचा सामना केला. ३० जानेवारीच्या रात्री उत्तराखंडच्या नाझूल धोरणाच्या तरतुदींनुसार नोटीस जारी करण्यात आली. तसेच महानगरपालिका अधिनियम २०२१ आणि २००९ अंतर्गत १ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता सोडण्याची आणि पाडण्याची सूचना देण्यात आली. त्याचे पालन न केल्यास नगर निगम जबरदस्तीने ते पाडेल आणि ताब्यात घेईल, असेही नोटिशीमध्ये म्हटले आहे. साफियाच्या याचिकेत म्हटले आहे की, तिने नैनितालच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे निवेदन दाखल केले असून, फ्रीहोल्ड अर्ज निकाली काढण्याचे आदेश जारी करण्याचे आवाहन केले आहे. तोपर्यंत नगर निगमला हल्दवाणीमधील इमारत आणि जमिनीत हस्तक्षेप करण्यास मनाई करावी, अशी विनंती करण्यात आली. नैनितालच्या जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंह यांनी यापूर्वी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, ज्या मालमत्तेमध्ये दोन बांधकामे आहेत, ती नगर निगमची नझूल जमीन म्हणून नोंदणीकृत आहे आणि ३० जानेवारीच्या नोटीसनुसार तीन दिवसांत अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे किंवा मालकीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. द इंडियन एक्स्प्रेसला मिळालेल्या माहितीनुसार, हायकोर्टाने या प्रकरणात याचिकाकर्त्याला कोणताही तात्काळ दिलासा दिला नाही, तसेच यंदा १४ फेब्रुवारीला प्रकरणावर सुनावणी होणार आहे.