उन्हाळी हंगामात रानाची नांगरणी करावी, पाउस झाल्यानंतर एखादी इरड पाळी मारून रान लोण्यासारखं मउसूत करावं. मिरगाचा पेरा, मोत्याचा तुरा औंदा साधलं म्हणत पेरणीही करावी, अन् अचानक वळवाचा पाउस आल्याप्रमाणं अवचित येउन हातातोंडाला आलेल्या पिकांची कणसं कुणीतरी न्ह्यावीत अशी गत झाल्याची खंत सांगली जिल्ह्यातील एका माजी मंत्री असलेल्या शेतकरी नेत्याने व्यक्त केली. औंदा मात्र मलाच संधी मिळावी अशी आर्जववजा मागणीही केली. यावेळी व्यासपीठावरच उपस्थित असलेल्या व उमेदवारी निश्चित मानल्या जात असलेल्या मित्रपक्षाच्या नेत्याची अवस्था मात्र, ‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय’ अशी झाली. आता ही मागणी काय खऱ्यातली नव्हती, उगा आपलं दावणीचा हललेला खुंटा बळकट करण्याचा कसानुसा प्रयत्न होता. निदान या निमित्तानं तर पुढचा बाजार नेते मंडळी जातीने आपल्याकडे लक्ष देतील इतकीच माफक अपेक्षा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेसाठी ‘चला हवा येऊ द्या’

राज्य रस्ते महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा ‘विश्वजीत’ यांना आता लातूर लोकसभेचे उमेवार व्हावे असे वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी पहिला जाहीर कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ पासून सुरू केला आहे. काही दिवसापूर्वी अनिल गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती. यापूर्वी लातूरमधून सुनील गायकवाड यांच्या नावाची चर्चा पेरण्यात आली होती. लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, आता ‘ चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून उमेदवारीची चर्चा घडवून आणली जात आहे. मुंबईतील श्रीमंत उमेदवाराची हवा हे लातूरचे सूत्र व्हावे, अशीही चर्चा आता मतदारांमध्ये आहे.

श्रेयवादाची लढाई

राजकीय श्रेय घेण्यासाठी सध्या सर्वाची पक्षांची चढाओढ लागलेली असते. याचा प्रत्यय नुकताच वसईतील रोरो सेवेच्या उद्घटनाच्या वेळी पाहायला मिळाला. या सेवेचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झाले. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर वसई, तर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे भाईंदर येथे उद्घटनासाठी कार्यकर्त्यांसह जमले. रो-रो ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना असल्याने भाजपदेखील मागे नव्हती. वसई जेट्टीवर बहुजन विकास आघाडी आणि भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाहायला मिळाली. रोरोचे श्रेय घेण्याचा प्रयत्न रंगला. या राजकीय श्रेयवादाच्या लढाईत महाराष्ट्र सागरी मंडळ अडचणीत आले. त्यामुळे रोरो सेवेचे कुठलेही औपचारिक उद्घाटन झालेले नसून सध्या प्रायोगिक तत्त्वावर रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रक काढल्याने राजकीय मंडळींचा हिरमोड झाला.

जावईबापूंची मर्जी

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात शिवसेनेचे अधिवेशन पार पडले. पहिल्यावहिल्या अधिवेशनात कुरबुरी,एका घटनेने मात्र चांगलेच लक्ष वेधले होते. त्यालाही शिवसेनेतील दोन गटांतील वादाची किनार होती. स्थानिक संयोजक राजेश क्षीरसागर यांचे त्यांचेच सहकारी असलेले रविकिरण इंगवले यांच्याशी बिनसले आहे. रविकरण हे ठाकरे सेनेचे शहर प्रमुख बनले आहेत. त्यांचे सासरे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील. राजेश क्षीरसागर यांनी सर्व आमदारांचे फोटो असणारा फलक अधिवेशनस्थळी उभा केला होता. त्यात नेमका  पाटील यांचा फोटो नव्हता.  शहाजीबापूंना भाषणासाठी पाचारण केले, तेव्हा त्यांनी सर्वाचा नामोल्लेख केला, पण क्षीरसागर यांचे नाव टाळले आणि मानापमानाचा हिशोब ओक्केच करून जावईबापूंची मर्जी अशाप्रकारे राखली.

शंभर मतांची काळजी

सोलापूरमध्ये सध्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापुरात आले की त्यांना भेटून अडचणी मांडणे किंवा निवेदन देणे खूपच कठीण झाले आहे. अलीकडेच चंद्रकांत पाटील यांच्या सोलापूर भेटीत कडेकोट पोलीस सुरक्षा व्यवस्था असताना एका कार्यकर्त्यांला पोलिसांनी अडविले. भेटीसाठी तो वारंवार धडपड करीत होता. ही बाब पालकमंत्र्यांच्या लक्षात आली. त्यांनी पोलिसांच्या लगेचच सूचना देऊन त्या कार्यकर्त्यांला अडवू नका म्हणून बजावले. तो कार्यकर्ता भेटीअभावी निराश होऊन परत गेला तर आमच्या पक्षाची शंभर मते तरी कमी होतील. हे नुकसान आता व्हायला नको, अशी मिश्किल टिप्पणी करीत पाटील यांनी हास्य मुद्रेने त्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्याची अडचण ऐकून घेतली.

अबोला भाजपला महागात पडणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे छत्रपती संभाजीनगरहून ते हेलिकॉप्टरने नगरला येणार होते. त्यांना येण्यास काहीसा अवधी होता. त्यांच्या स्वागतासाठी खासदार डॉ सुजय विखे, आमदार राम शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले असे पदाधिकारी वाट पहात थांबले होते. सुजय विखे व राम शिंदे हे दोघे नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे भाजपमधील प्रमुख दावेदार आहेत. दोघांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच आणि शीतयुद्धही सुरू आहे. गडकरींची अर्धा तास वाट पाहत शेजारीशेजारी बसूनही विखे-शिंदे यांच्यामध्ये मात्र एका शब्दानेही संवाद घडला नाही. हा अबोला लोकसभा निवडणुकीत भाजपला महागात पडू शकतो का, याचीच चर्चा सुरू झाली. कारण कोणालाही उमेदवारी मिळाल्यास दुसरा जुने हिशेब चुकते करण्याची संधी सोडणार

नाही. (संकलन : दिगंबर शिंदे, सुहास बिऱ्हाडे, सुहास सरदेशमुख, एजाज हुसेन मुजावर, मोहनीराज लहाडे, दयानंद लिपारे)

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chavdi happening in maharashtra politics news on maharashtra political crisis amy
Show comments