या वर्षाच्या शेवटी राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. सध्या येथे काँग्रेसची सत्ता असून अशोक गेहलोत हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. १९९३ सालापासून येथे प्रत्येक निवडणुकीत सत्तापालट झालेले आहे. त्यामुळे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यास अशोक गेहलोत हे चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील. दरम्यान, येथे थेट काँग्रेस आणि भाजपा यांच्यात लढत होत असली, तरी निवडणुकीच्या निकालानंतर अपक्षांनाही तेवढेच महत्त्व असणार आहे. कारण कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अपक्षांची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थानच्या निवडणुकीचा इतिहास काय? भूतकाळातील निवडणुकांत अपक्षांचे स्थान काय होते? हे जाऊन घेऊ या…

तीन दशकांत काँग्रेस, भाजपा यांच्यात थेट लढत

गेल्या तीन दशकांत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झालेली आहे. असे असले तरी या तीन दशकांत अपक्ष उमेदवार तिसरी शक्ती म्हणून उदयास आलेले आहेत. १९५१ ते २०१८ या कालावधीतील एकूण १५ निवडणुकांत अपक्ष आमदार हे जिंकलेल्या जागांच्या बाबतीत आतापर्यंत नऊ वेळा तिसरा सर्वांत मोठा गट ठरलेले आहेत; तर मिळालेल्या मतांच्या बाबतीत अपक्षांचा गट एकूण १० वेळा तिसऱ्या स्थानी राहिलेला आहे. येथे काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांव्यतिरिक्त बहुजन समाज पार्टी, सीपीआय (एम), राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी, भारतीय ट्रायबल पार्टी, राष्ट्रीय लोकदल आदी पक्ष खास कामगिरी करू शकलेले नाहीत.

ubt shiv sena candidate chandrahar patil meet congress leaders in sangli
बंडखोरीवर कारवाई टाळत मविआ उमेदवाराला विजयी करण्याचे पटोलेंचे आवाहन
Udayanraje Bhosale
“साताऱ्यासाठी एकही चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळाला नाही”, उदयनराजे भोसलेंची शरद पवार गटावर टीका
congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !

काँग्रेस पक्ष १९५१, १९५७ सालच्या निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर

निवडणूक आयोगाकडे असलेल्या माहितीनुसार राजस्थानच्या १९५१ आणि १९५७ या पहिल्या दोन निवडणुकांत अपक्षांचा गट हा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. १९५१ साली राजस्थानच्या १६० सदस्य असलेल्या विधानसभेत एकूण ३५ अपक्ष आमदार होते, तर १९५७ साली १७६ सदस्य असलेल्या विधानसभेत एकूण ३२ अपक्ष आमदार होते. काँग्रेस पक्ष १९५१ आणि १९५७ सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. या निवडणुकांत काँग्रेसचा अनुक्रमे ८२ आणि ११९ जागांवर विजय झाला होता.

१९६७ सालच्या निवडणुकीत अपक्षांचा गट चौथ्या स्थानी

१९६२ सालच्या विधानसभा निवडणुकीत अपक्षांची संख्या काहीशी कमी झाली होती. अपक्षांचा गट या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. या निवडणुकीत काँग्रेसचा ८८ जागांवर विजय झाला होता, तर स्वतंत्र पार्टी या पक्षाने एकूण ३६ जागांवर विजय मिळवला होता. हा पक्ष विजयी उमेदवारांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी होता. १९६७ सालच्या निवडणुकीत अपक्षांचा गट चौथ्या स्थानी पोहोचला होता. या निवडणुकीत फक्त १६ अपक्ष उमेदवारांचा विजय झाला होता. १९६७ सालच्या निवडणुकीत काँग्रेस (८९), स्वतंत्र पार्टी (४८), भारतीय जनसंघ (२२) हे तीन पक्ष अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.

१९७७ सालच्या निवडणुकीत जनता पार्टीने मारली बाजी

१९७२ सालच्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते. १८४ सदस्य असलेल्या विधानसभेत काँग्रेसचा १४५ जागांवर विजय झाला होता, तर स्वतंत्र पार्टी आणि जनसंघ या पक्षांनी अनुक्रमे ११ आणि ८ जागांवर बाजी मारली होती. या निवडणुकीत एकूण ११ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. १९७७ सालच्या निवडणुकीत जनता पार्टी या पक्षाने बाजी मारली होती. या निवडणुकीत २०० सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत जनता पार्टीच्या एकूण १५२ उमेदवारांचा विजय झाला होता, तर काँग्रेसला ४१ जागांवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत फक्त पाच जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

पहिल्याच निवडणुकीत भाजपाचा ३३ जागांवर विजय

१९८० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीचा प्रवेश झाला. २०० सदस्यसंख्या असलेल्या या निवडणुकीत काँग्रेसचा एकूण १३३ जागांवर विजय झाला होता. भाजपाची स्थापना झाल्यानंतर हा पक्ष राजस्थानमध्ये पहिलीच निवडणूक लढवत होता. या निवडणुकीत भाजपाचा ३२ जागांवर विजय झाला होता; तर १२ जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला होता. अपक्षांचा गट या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी होता.

१९८५ साली काँग्रेसने सत्ता कायम राखली

१९८५ साली काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसच्या (११३) जागा कमी झाल्या; तर भाजपा (३९), लोकदल (२७) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी होते. या निवडणुकीत १० अपक्ष उमेदवारांचा विजय झाला होता. १९९० सालच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. २०० सदस्यसंख्या असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा ८५ जागांवर, तर जनता दलाचा ५५ जागांवर विजय झाला. काँग्रेस (५) थेट तिसऱ्या स्थानी फेकला गेला. या निवडणुकीत ९ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

१९९३ नंतर राजस्थानमध्ये प्रत्येक ५ वर्षांनी सत्तांतर

१९९३ सालानंतर राजस्थानमध्ये प्रत्येक पाच वर्षांनी सत्तांतर झाले आहे. १९९३ सालच्या निवडणुकीत भाजपाचा ९५ तर काँग्रेसचा ७६ जागांवर विजय झाला. १९९८ साली काँग्रेसचा १५३ तर भाजपाचा ३३ जागांवर, २००३ साली भाजपाचा १२० आणि काँग्रेसचा ५६ जागांवर विजय झाला. २००८ साली काँग्रेस ९६ आणि भाजपाचा ७८ जागांवर, २०१३ साली भाजपाचा १६३ आणि काँग्रेसचा २१ जागांवर, २०१८ साली काँग्रेसचा १०० तर भाजपाचा ७३ जागांवर विजय झाला. या निवडणुकांत अपक्षांचा १९९३ साली २१ जागांवर विजय झाला होता. १९९८ साली ७ जागा, २००३ साली १३, २००८ साली १४, २०१३ साली ७, २०१८ साली १३ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.