नीरज राऊत

मतदारसंघातील विजयासाठी भाजपच्या सहकार्याची गरज हेरून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात राहण्यासाठी आणि पुढील निवडणुकीत लोकसभेऐवजी विधानसभेची उमेदवारी घेऊन राज्यात मंत्रिपद मिळवण्याचे गणित जुळवण्यासाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावित शिंदे गटात दाखल झाले आहेत. या गट बदलामुळे काँग्रेस नंतर भाजप, शिवसेना व आता शिवसेनेतील शिंदे गट असा राजकीय उड्यांचा त्यांचा प्रवास आहे. २०२४ मध्ये ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याची आता सर्वांना उत्सुकता आहे.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा
Thane Lok Sabha
कोणताही उमेदवार द्या पण, तो शिवसेनेचाच असावा; नवी मुंबईतील शिबिरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लावला सूर

पालघर भागातील शिवसेनेचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी काँग्रेस उमेदवाराच्या शोधात असताना मीरा रोड येथे गॅस एजन्सीच्या निमित्ताने नंदुरबार येऊन स्थायिक झालेल्या राजेंद्र गावित यांनी २००३ च्या सुमारास पालघरमध्ये राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना आर्थिक ताकदीच्या बळावर विश्वासात घेऊन सन २००४ मधील विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढविली. या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही निराश न होता गावित यांनी परिसरात आपले काम सुरू ठेवून लोक संपर्क वाढवण्यावर भर दिला. विधानसभेच्या २००९ मधील निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर त्यांना पालघर मतदारसंघात यश आले. त्यांना आघाडी सरकारने २०१३ आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्रीपद दिले. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकी काँग्रेसमधून लढताना ते पालघर मतदारसंघातून अवघ्या ५१५ मतांनी पराभूत झाले. काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी त्यांना नेहमी उपरा असे हिणवले. तसेच स्थानिक काँग्रेसी नेत्यांना पुढे येऊ न देण्याच्या गावित यांच्या राजकारणावर ठपका ठेवून नंदुरबारला परत पाठवण्याच्या वल्गनाही काँग्रेसची पालघरमधील मंडळी करू लागली. त्यांच्या मनातील ही खदखद लक्षात घेऊन खासदार चिंतामण वनगा यांच्या आकस्मिक निधनानंतर २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली व प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पोट निवडणुकीत निवडून आणले. आपण दिल्लीच्या वातावरणात व राजकारणात रमत नसल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले.

हेही वाचा- पुणे जिल्ह्यातील शिवसेनेची बिकट वाट, आजी आजी-माजी खासदार शिंदे गटात

लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यानंतर युतीचे उमेदवार म्हणून गावित यांनी ही जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढवली आणि ते विजयी झाले. मात्र स्थानिक शिवसैनिकांशी ते जवळीक साधू शकले नाहीत. त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या कोंडाळ्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्याशी मर्यादित व औपचारिक संबंध ठेवला.

खासदारांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या राजेंद्र गावित यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहू असे सांगितले होते. मात्र मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत १५० ते २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचा लाभ व राजकारणात आपण मुख्य प्रवाह राहावे यासाठी त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल होणे पसंत केले. आगामी निवडणुकीत त्यांना पालघरमधून शिवसेनेकडून लढताना अनेक अडचणी येण्याची शक्यता पाहता काँग्रेस व भाजपाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न गावित यांनी सुरू ठेवले होते. खासदारकीपेक्षा पालघर विधानसभेची आमदारकी मिळवून राज्यात मंत्रिपद घेण्यास ते अनुकूल आहेत. एकंदर स्थानिक शिवसैनिकांकडून त्यांना होणारा विरोध व आगामी काळातील असहकार्य दृष्टीक्षेपात ठेवत गावित यांनी शिंदे गटात जाणे पसंत केल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा- प्रतीक जयंत पाटील यांच्या फलकांवरून पवार घराणे गायब

खासदार राजेंद्र गावित यांचा राजकीय प्रवास हा बहुतांशी आत्मकेंद्रित राहिला व सत्ताधाऱ्यांकडे जाण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून आली. ज्या पक्षांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले त्या पक्षांच्या वाढीसाठी व संगटना बळकट करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले नाही. बुलेट ट्रेन व वाढवण बंदर या केंद्राच्या प्रकल्पांना त्यांनी अनेकदा जाहीर व्यासपीठावरून विरोध दर्शवला होता. मात्र भाजपशी संलग्न अशा शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना आपली भूमिका बदलावी लागेल. त्यांचा आजवरचा प्रवास पाहता गावित ही भूमिका सहजपणे बदलतील, असा अंदाज आहे