सोलापूर : भाजपचा मजबूत बालेकिल्ला बनलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मागील सलग दोनवेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्या कन्या, आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. ही दुरंगी लढत काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांसाठी विलक्षण चुरशीची ठरत असताना काँग्रेसने स्थानिक विकासाच्या प्रश्नासह भाजपने उपरा उमेदवार लादल्याचा कळीचा मुद्दा बनविला आहे. तर भाजपने ही जागा राखण्यासाठी हिंदुत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यासह लिंगायत आणि पद्मशाली समाजावर भिस्त ठेवल्याचे दिसून येते.

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच १९९० साली भाजपचा आमदार सोलापूरकरांनी निवडून दिला होता. त्यानंतर १९९६ साली खासदारही निवडून पाठवला होता. गेल्या २८ वर्षात भाजपचे ५ खासदार लोकसभेत गेले असताना सध्या मागील वर्षात या पक्षाचा या मतदारसंघात एकतर्फी विस्तार झाला आहे. येथील सहा विधानसभांपैकी पाच विधानसभा भाजपसह महायुतीच्या वर्चस्वाखाली असताना त्या तुलनेत काँग्रेससह महाविकास आघाडीची ताकद खालावलेली दिसते. त्याचा विचार करता यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी सहजसोपी होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात विजयासाठी खडतर वाट ठरली आहे. मागील दहा वर्षातील दोन्ही खासदारांची सुमार कामगिरी आणि आता तिस-यांदा बदललेला उमेदवारही ‘उपरा’ असल्याची निर्माण होणारी जनभावना, अशा भाजपच्या विरोधात नकारात्मक वातावरण निर्मितीवर काँग्रेसचा भर पाहावयास मिळतो. मराठा आक्षरण आंदोलन, शेतकरी वर्गात सरकारविरोधी नाराजी सूर, भाजपचा ‘चारसौ पार ‘ चा नारा देण्यामागे संविधान बदलले जाण्याची आंबेडकरी समाजासह मागासवर्गीय घटकांमध्ये दिसणारी सुप्त भीती आदी बाबी काँग्रेससाठी पोषक ठरू पाहतात. यात आणखी भर म्हणजे यंदा एमआयएम पक्षाने उमेदवार उभा केला नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी शेवटच्या क्षणी पक्षाला अंधारात ठेवून माघार घेत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा विचार करता भाजपविरोधी मतविभागणी टळण्याची चिन्हे काँग्रेससाठी सुचिन्ह मानले जाते. कन्येसाठी सुशीलकुमार शिंदे हे इंच इंच जागा लढविताना आपले विरोधक माकपचे नेते नरसय्या आडम, महेश कोठे, दिलीप माने, पंढरपूरचे भगिरथ भालके, मोहोळचे संजय क्षीरसागर आदींची ताकद गोळा करीत आहेत. यातच ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची मोठी भर पडली आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
narendra modi marathi news, narendra modi lok sabha marathi news
नरेंद्र मोदी एवढे चिंतातूर का झाले आहेत?
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

हेही वाचा : राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात जंगली प्राण्यांचा उच्छाद

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते दोघेही तुल्यबळ तरूण आमदार तेवढेच चपळ आणि आक्रमक आहेत. पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा, नवीन उद्योग प्रकल्पाचा अभाव, विमानसेवेच्या नावाखाली सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडणे, उड्डाणपुलाची रखडलेली उभारणी, कोणाचीही मागणी नसताना सूरत-चेन्नई हरित महामार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील कमी दराने आणि सक्तीने झालेले भूसंपादन, २२०० कोटी रूपये खर्च करूनही स्मार्ट सिटी प्रकल्पाचा झालेला फोलपणा, उजनी-सोलापूर दुहेरी पाणीपुरवठा योजनेची निविदा मंजूर करताना पारदर्शकतेचा अभाव, भूसंपादन होऊनही बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची रखडलेली उभारणी, प्रत्यक्ष उभारणी होऊनही सुरू न झालेल्या सीमा सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राच्या खितपड पडलेल्या इमारती आणि भूसंपादन होऊनही रखडलेली औद्योगिक सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राची उभारणी आदी मुद्यांवर मागील दहा वर्षात भाजपच्या दोन्ही खासदारांनी दाखविलेली निष्क्रियता, या विषयांवर आणि आता उपरा उमेदवार देण्यावरून काँग्रेसकडून भाजपला अडचणीत आणले जात आहे. त्यास प्रत्युत्तर देताना राम सातपुते हे मागील दहा वर्षाच्या भाजपने अर्थात मोदी सरकारने देश स्तरावर केलेल्या विकास कामांची यादी समोर ठेवतात आणि सोबत हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरतात. मराठा आरक्षण आंदोलकांची आडकाठी पाहून, खासदार झालो तरी मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही, असे पण करतात. राम नवमी, गुढी पाडवा, हनुमान जयंती यासारख्या उत्सवांमध्ये सहभागी होताना सातपुते हे ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा’ ही घोषणा द्यायला विसरत नाहीत. मशिदींमधून मोदींच्या पराभवासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे काढले जात असल्याचा सनसनाटी आरोपही करतात. या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करीत असताना कर्नाटकातील हुबळी-धारवाड येथे नेहा हिरेमठ या तरूणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेचे आयते कोलित सातपुते यांना सापडते आणि ते या घटनेला ‘लव्ह जिहाद’ चा शिक्का मारून लिंगायत समाजाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतात. हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवताना मोदी हेच सोलापूरचे उमेदवार आहेत असे समजून मते देण्याचे आवाहन सातपुते यांच्याकडून केले जात असून यात मतदारसंघात प्रभावशाली ठरणा-या कन्नड भाषिक लिगायत आणि तेलुगुभाषिक पद्मशाली समाजावर भाजपची भिस्त दिसून येते. यापैकी लिंगायत समाजाची मते काँग्रेसकडे वळविण्यासाठी सिध्देश्वर साखर कारखान्याचे अध्वर्यू असलेले लिंगायत समाजातील बडे प्रस्थ धर्मराज काडादी हे सक्रिय झाले आहेत. काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली असून भाजपसाठी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.