वाशीम : पक्षफुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी अजित पवारांचा हात धरला. यामुळे शरद पवार गटाची वाट खडतर मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून नव्याने पक्षबांधणी केली जात आहे. याच क्रमात रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा येत्या बुधवारी जिल्ह्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र, ही यात्रा पक्षाला नवसंजीवनी देणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी दोन ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे. स्थानिक स्वराज संस्था, बाजार समित्या, पंचायत समित्या व इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचाच दबदबा होता. परंतु आता राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार गटाचे जिल्हा परिषद, पंचायत समित्या व बाजार समित्यांवर वर्चस्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शरद पवार गट विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे.

हेही वाचा – राजकीय दिशा बदलू शकणारे आंबेडकरी शक्तिप्रदर्शन, वंचित आणि काँग्रेसची जवळीक ?

राज्यातील बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षार्थी, पदवी असूनही हाताला काम नसणारे विद्यार्थी, या व इतर समस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील १३ जिल्ह्यांतून युवा संघर्ष यात्रा काढली आहे. ही यात्रा २९ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून रिसोड तालुक्यात दाखल होत आहे. रिसोड तालुक्यातील व्याड, चिखलीमार्गे ३० नोव्हेंबर रोजी वाशीम शहरात यात्रा पोहोचणार आहे. येथील शिवाजी हायस्कूल येथे रोहित पवार युवकांशी संवाद साधतील. या यात्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला उभारी देण्यात ही यात्रा कितपत यशस्वी होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा – जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय घेऊनही भाजपच्या वाट्याला अपश्रेयच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार यांच्या विचारावर प्रेम करणारे कार्यकर्ते कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करतात. पक्ष सोडून गेलेल्यांमुळे काहीच फरक पडणार नाही. उलट नवीन चेहऱ्यांना संधी मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे नियोजन असून त्यात निष्ठा आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. आम्ही येणाऱ्या निवडणुका ताकदीने लढू. युवा संघर्ष यात्रेमुळे पक्षाला नक्कीच बळ मिळेल. – बाबाराव पाटील खडसे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)